राज्यातील सरकार अजून चार वर्षे काय २० वर्षे चालेल, असं वक्तव्य विरोधक भाजपला टोमणा मारताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी केलं आहे. या विधानाबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी कितीही स्वप्न बघू देत. पण हे बेईमानीनं आलेलं सरकार आहे. हे त्यांनाही ठाऊक आहे, असं उत्तर फडणवीस यांनी दिलं.
विधान परिषदेच्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारासाठी आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पहाटेच्या शपथविधीबाबत विचारलं, यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता जेव्हा सरकार बघायला मिळेल, तेव्हा ते पहाटेचं सरकार नसेल. तर योग्य वेळी सत्तेत येणारं सरकार पाहायला मिळेल. या अल्पकालीन सरकारवर एक पुस्तक लिहिणार असल्याची माहिती देखील फडणवीस (devendra fadnavis) यांनी दिली.
तर राज्यातील सरकार अजून चार वर्षे काय २० वर्षे चालेल, असं मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, त्यांनी कितीही स्वप्न बघू देत. पण त्यांना हे ठाऊक आहे की, जनतेने त्यांना निवडून दिलेले नव्हतं. हे बेईमानीनं आलेलं सरकार आहे.
हेही वाचा - पहाटेच्या धक्क्यातून ‘ते’ अजून सावरलेले नाहीत- संजय राऊत
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा सुरू असताना २३ नोव्हेंबरच्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना हाताशी घेऊन राष्ट्रवादीचे काही आमदार फोडल्याचा दावा करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. परंतु राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी डावपेच आखत अजित पवार यांचं मन वळवून पुन्हा एकदा त्यांना माघारी यायला भाग पाडलं होतं. त्यामुळे हे सरकार औटघटकेचं ठरलं.
(opposition leader devendra fadnavis slams cm uddhav thackeray lead maha vikas aghadi government)