पालघर लोकसभा मतदारसंघात सोमवारी झालेल्या पोटनिवडणुकीदरम्यान व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्यानंतर मंगळवारी अाणखी एक वाद समोर अाला अाहे. पोटनिवडणूक झाल्यानंतर ईव्हीएम मशीन खासगी गाडीतून नेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
चिंचरे येथील बूथ क्रमांक १७ मधील काही कर्मचाऱ्यांनी मतदानानंतर ईव्हीएम मशीन निवडणूक आयोगाच्या बसमधून न नेता खासगी गाडीतून नेल्या. त्यावेळी काही नागरिकांनी ही गाडी किराट गावाजवळ अडवली आणि गाडीत असणारे निवडणूक झोन अधिकारी दीपक खोत आणि मनोहर खांदे यांची चौकशी केली. मात्र, या मशीन्स खासगी गाडीतून का नेण्यात अाल्या, यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशिन्स निवडणूक आयोगाच्या बसमधून नेण्यास सांगितलं होते. यावेळी चिंचरे येथील बूथ क्रमांक १७ मधील काही कर्मचाऱ्यांनी तेथील ईव्हीएम निवडणूक आयोगाच्या बसमधून न नेता लाल रंगाच्या एमएच-०३ बीएस - ०९८० या खासगी गाडीमधून नेल्या.
ईव्हीएम मशीन्स गाडीतून नेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी किराट गावाजवळ गाडी अडवली आणि त्यांची चौकशी केली. त्यावेळी गाडीतील कर्मचारी त्यांच्याशी वाद घालत होते. गाडीतील ईव्हीएम मशीन बाहेर काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी बोलावले. पोलिसांनी कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना ताब्यात घेतलं आहे. या संपूर्ण प्रकाराची माहिती पोलिसांनी निवडणूक आयोगाला दिली अाहे.
याप्रकरणी, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी निवडणुकीनंतर सर्व ईव्हीएम मशीन नेण्यासाठी सरकारी वाहने ठेवली आहेत, असं निवडणुकीअाधी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. मात्र या प्रकारानंतर अाता निवडणूक कर्मचाऱ्यांसह निवडणूक अायोगाच्या भूमिकेवर अनेक संशय व्यक्त केले जात आहेत.
हेही वाचा -