अवघ्या काही दिवसांपूर्वी झालेला शेतकरी संप अखेर सरकारने कर्जमाफी जाहीर करुन मिटवला. त्याला एक आठवडा पूर्ण होतो तोच गुरुवारी सकाळी कल्याणच्या नेवळीत आंदोलनकर्त्या संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांची व्हॅन पेटवल्याची घटना घडली आहे.
हे देखील वाचा -
शेतकरी कर्जमाफीवरून श्रेयवादाचा अंक सुरू
एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नेवळीत गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आपल्या मागण्यांसाठी सरकारविरोधात आंदोलन करत होते. यामध्ये महिला शेतकऱ्यांचाही समावेश होता. पण गुरुवारी सकाळी शेतकऱ्यांनी गावातून मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिस बळाचा वापर करण्यात आल्याने आंदोलक चिडले. संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांची व्हॅन फोडली आणि पेटवून दिली. त्यामुळे अंबरनाथ-कल्याणहून नेवाळीमार्गे वाशी, पनवेल आणि मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली. यावेळी जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलिस जखमी झाली. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला.
राज्यात मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या जमीन संपादनावरुन जोरदार वाद सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आता कल्याणमधील नेवळीच्या भाल आणि डावळपाडा भागातही शेतकऱ्यांनी जमीन संपादनावरुन आंदोलन छेडले. कल्याण-श्रीमलंगड मार्गावर असलेल्या गावांमधील जमिनी बळकावून तेथे कुंपण घालण्याचे काम सरकारकडून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना आपल्या मालकीच्या जमिनीवर पेरणी करायला सरकारने बंदी घातली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी राज्य आणि केंद्र सरकार विरोधात आंदोलन छेडले.
पिकवलेल्या भाजीपाल्याला योग्य दर मिळत नसल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी 1 जून रोजी संप पुकारला होता. कर्जमाफी आणि शेतकमालाला हमीभाव मिळावा यासह कमी दरात वीज उपलब्ध व्हावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. या संपामुळे मुंबईत फळे, भाज्या यांची आवक घटली, तर दूध संकलनातही काही प्रमाणात घट झाली होती. या आंदोलनाचा फटका नाशिक आणि अहमदनगरसारख्या प्रमुख उत्पादन केंद्रालाही बसला. त्यामुळे मुंबईत भाज्या आणि फळांची आवक घटल्याने त्यांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली होती.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)