Advertisement

उर्मिलाच्या राजीनाम्यामागे ‘हे’ कारण?

काँग्रेसमधील वरिष्ठांना पक्षबांधणीत रस नसल्याने तसंच पक्षांतर्गत राजकारणासाठी मला स्वत:चा वापर होऊ द्यायचा नसल्याने आपण काँग्रेस सोडल्याचं उर्मिलाचं म्हणणं असलं, तरी उर्मिलाने पक्ष सोडण्यामागे वेगळीच कहाणी असल्याचं म्हटलं आहे.

उर्मिलाच्या राजीनाम्यामागे ‘हे’ कारण?
SHARES

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने अवघ्या ६ महिन्यांत काँग्रेसचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसने स्टार कॅम्पेनर गमावल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. काँग्रेसमधील वरिष्ठांना पक्षबांधणीत रस नसल्याने तसंच पक्षांतर्गत राजकारणासाठी मला स्वत:चा वापर होऊ द्यायचा नसल्याने आपण काँग्रेस सोडल्याचं उर्मिलाचं म्हणणं असलं, तरी उर्मिलाने पक्ष सोडण्यामागे वेगळीच कहाणी असल्याचं म्हटलं आहे.  

६ महिन्यांची कारकिर्द

लोकसभा निवडणुकीच्या अवघे काही दिवस आधी उर्मिला काँग्रेसमध्ये येऊन दाखल झाली हाेती. त्यानंतर तिला थेट काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत उर्मिलाला भाजपचे तगडे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्याकडून तब्बल ४,६४,०२८ मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या निवडणुकीत संजय निरूपम समर्थकांनी प्रचाराचं काम व्यवस्थित न केल्याने आपला पराभव झाला. त्यामुळे या काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी उर्मिलाने केली होती. परंतु या मागणीकडे तत्कालीन मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी दुर्लक्ष केलं. उर्मिलाने देवरा यांना लिहिलेलं पत्र व्हायरल झाल्यानेही ती नाराज होती.  

स्टार कॅम्पेनर

त्यानंतरही नाराजी दूर सारून ती काँग्रेसच्या कार्यक्रमांना स्टार कॅम्पेनर म्हणून हजर रहात होती. काही दिवसांपूर्वीच तिने सांगली, कोल्हापूरमधील पूरग्रस्त परिसराची पाहणी केली होती. त्यानंतर ५ सप्टेंबरला बोरीवलीत पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील पूरस्थितीसाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला जबाबदार धरलं होतं. असं असूनही तिने अचानक राजीनामा का दिला यावर चर्चा रंगल्या आहे. 

निवडणूक लढवण्याची इच्छा

त्यापैकी एक कारण म्हणजे उर्मिलाला वांद्रे मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. परंतु या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी त्यांना जोरदार विरोध केला. तसंच माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी देखील वांद्रे मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी जोर लावत असल्याने आपल्याला इथून तिकीट मिळणार नाही, हे उर्मिलाला बहुदा स्पष्ट झालेलं असावं, यातूनही तिने राजीनामा दिला असावा असं म्हटलं जात आहे. 



हेही वाचा-

उर्मिला मातोंडकरची काँग्रेसला सोडचिठ्ठी

देवरांच्या राजीनाम्यानंतर उर्मिलाचा ‘लेटर बाॅम्ब’



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा