Advertisement

Covid-19 in Dharavi: धारावीत कोरोनावर यश संघ स्वयंसेवकांमुळेच? हा जरा अतिरेकच- शिवसेना

धारावीत जे कोरोनावर यश मिळालं ते फक्त संघ स्वयंसेवकांमुळेच! असा नवा प्रचारी फंडा राबवला जातोय. हा जरा अतिरेकच झाला.

Covid-19 in Dharavi: धारावीत कोरोनावर यश संघ स्वयंसेवकांमुळेच? हा जरा अतिरेकच- शिवसेना
SHARES

धारावीत जे कोरोनावर यश मिळालं ते फक्त संघ स्वयंसेवकांमुळेच! असा नवा प्रचारी फंडा राबवला जातोय. हा जरा अतिरेकच झाला. पांढऱ्या कपड्यांतील देवदूतांचा अपमान आहे. म्हणजे काही चांगलं घडलं की, आमच्यामुळे! रेड्याला रेडकू झालं आमच्यामुळे, वाळवंटात हरभरा टरारून वर आला आमच्यामुळे. हे असले प्रकार यांना संकटसमयी सुचतात तरी कसे? असा प्रश्न विचारत शिवसेनेने भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. (Saamana editorial on devendra fadnavis and dharavi battle against covid-19 )

कर्मचाऱ्यांचं काम मोठं

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला आणि कोरोनाबाबतच्या आक्षेपांना लक्ष्य करण्यात आलं आहे. या अग्रलेखात लिहिलं आहे की, कोरोनाबाबतच्या बातम्या संमिश्र आहेत. जो तो आपापल्या पद्धतीने आता कोरोनावर प्रवचनं देऊ लागला आहे. डॉक्टर, पोलीस, परिचारिका, वॉर्डबॉय हे प्रत्यक्ष युद्धावर आहेत व त्यात त्यांना प्राण गमवावे लागत आहेत. मुंबईच्या उपनगरात कोरोनामुक्तीसाठी अहोरात्र झटणारे पालिकेचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार हे कोरोनाशी लढताना शहीद झाले आहेत. वांद्रे पूर्व परिसर कोरोनामुक्त करण्यासाठी खैरनार यांनी जिवाची बाजी लावली व त्यातच त्यांनी प्राण गमावला. हे असे लढवय्ये आहेत म्हणून कोरोनाशी आपण सामना करू शकतो.

हेही वाचा- धारावी मॉडेलचं जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक

दाटीवाटीची वस्ती

धारावीसारख्या अतिगर्दीच्या, नियोजन नसलेल्या, दाटीवाटीच्या झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव झाला व ते संक्रमण पसरले तर हाहाकार माजेल, कोरोनास इथून बाहेर काढणं कठीण जाईल असं वाटत होतं, पण मुंबई महानगरपालिका व पोलिसांनी ही परिस्थिती उत्तमरीत्या हाताळली व तेथून कोरोनास मागे रेटलं. धारावीतून कोरोना पूर्णपणे हटला असा दावा नाही, पण त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं हे जागतिक आरोग्य संघटनेनं कबूल केलं.

अपयशाची प्रवचने

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्यभर दौरे करून कोरोना संकटाची माहिती करून घेत आहेत व कोरोनाशी लढताना सरकार कसं अपयशी ठरलं आहे यावर रोज प्रवचने झोडत आहेत. त्यापेक्षा त्यांनी एकदा संपूर्ण धारावी पालथी घालून सरकारी यंत्रणेने केलेलं यशस्वी काम पाहायला हवं.

पण ‘‘धारावीत जे कोरोनावर यश मिळालं ते फक्त संघ स्वयंसेवकांमुळेच!’’ असा नवा प्रचारी फंडा राबवला जातोय. हा जरा अतिरेकच झाला. संघाचं काम चांगलं नाही असं कोणी म्हणणार नाही, पण धारावीतील कोरोना नियंत्रणाच्या कार्यात सर्वच यंत्रणांनी मेहनत घेतली आहे. हे यश सामुदायिक आहे, मात्र त्यातही मुंबई महापालिकेचं काम मोठं आहे हे तुम्ही मान्य करणार की नाही? दिल्ली, उत्तर प्रदेश, पुणे, पिंपरी-चिंचवड वगैरे भागांत स्वयंसेवकांचं अस्तित्व आहे, मग तिथं संघ धारावीप्रमाणे दक्ष का नाही? त्यामुळे संघाला कोरोना युद्धात उगाच ओढण्याचं कारण नाही.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा