राज्य सरकारची नोकरी म्हणजे आयुष्यभरासाठी नो टेन्शन. बिनधास्त काम करा आणि पगार मिळवा, अशी बहुसंख्य तरूणांची धारणा असते. पण, तरूणांनो या मानसिकतेतून आता बाहेर या. कारण राज्य सरकारनेही खासगी कंपन्यांप्रमाणे कामात परफाॅर्मन्सला प्राधान्य द्यायचं ठरवलं असून जो उत्तम कामगिरी करेल, त्यालाच नोकरीत कायम करण्यात येणार आहे.
राज्य सरकारनं वर्षभरात ७२ हजार सरकारी पदं भरण्याचं जाहीर करत बेरोजगार तरूणांना आणि सरकारी नोकरीची संधी शोधणाऱ्या तरूणांना खुशखबर दिली आहे. या पदभरतीत परफाॅर्मन्सचा हा नवा फाॅर्म्युला आजमवण्याचं राज्य सरकारनं नक्की केलं आहे. त्यानुसार सरकारच्या या मेगाभरतीत नोकरी मिळाल्यावर तुम्हाला पुढील ५ वर्षांत कामगिरीत चमक दाखवावी लागेल. त्यानंतरच तुम्हाला या नोकरीत कायम करण्यात येईल.
हो, हे खरं आहे. सरकारच्या सरकारी मेगाभरती योजनेत ही अट टाकण्यात आली आहे. शिक्षण सेवकांचं पद भरताना ज्याप्रमाणे त्यांना ५ वर्षे ठराविक मानधनावर काम करावं लागतं, त्याप्रमाणंच या योजनेतील सरकारी नोकरदारालाही ५ वर्षे ठराविक मानधनावर काढावी लागणार आहेत. ५ वर्षांतील शिक्षक सेवकांची कामगिरी तपासत त्यांना कायम केलं जातं. त्याप्रमाणेच या नोकरदाराचींही ५ वर्षांची कामगिरी तपासूनच त्यांना सरकारी नोकरीत कायम करण्यात येणार आहे.
राज्य सरकारनं ७२ हजार सरकारी पदं भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या वर्षी ३६ हजार पद तर पुढच्या वर्षात उर्वरित ३६ हजार पद भरली जाणार आहेत. या योजनेसंदर्भातील एक शासन निर्णय राज्य सरकारनं प्रसिद्ध केला आहे. त्या शासन निर्णयात ५ वर्षांसह मानधनाची अट टाकण्यात आली आहे. त्यामुळं या नोकरीचा लाभ घेणाऱ्यांना चांगलंच काम करून दाखवावं लागणार हे मात्र निश्चित.
हेही वाचा-
पात्र अतिक्रमणधारकांना मिळणार एकरकमी भरपाई
मुंबईच्या विकास आराखड्याच्या नियमावलीची अधिसूचना जारी