मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन देऊनही ते न पाळल्याचा आरोप करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. राणे यांनी गुरूवारी दुपारी काँग्रेस सदस्यत्वासह आमदारकीचाही राजीनामा दिला.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर नारायण राणे भाजपात जातात की स्वत:ची ‘गट’स्थापना करतात, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. पण काँग्रेसमध्ये नाराज राणे काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील मात्र आ. नितेश राणे आणि राणेसमर्थक आ. कालिदास कोळंबकर हे दोघे काँग्रेसमध्येच राहतील हे 'मुंबई लाइव्ह'ने दिलेले वृत्त खरे ठरले आहे.
काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर शाब्दीक प्रहार करत राणे यांनी सिंधुदूर्गात केलेल्या भाषणादरम्यान काँग्रेसमधून स्वत:हून बाहेर पडत असल्याची घोषणा केली.
दुपारी अडीच वाजेच्या सुमारास विधान परिषद सभापतींकडे आमदारकीचा राजीनामा सोपवला. तर काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना ई-मेलने पाठवल्याचे राणे यांनी भाषणादरम्यान सांगितले.
राणे भाजपात जाण्याच्या बेतात असल्याने अशोक चव्हाण यांनी ‘दलबदलू सत्तेशिवाय राहू शकत नाही, ते गेल्याशिवाय इतरांना जागा मिळणार नाही.’, अशा शब्दांत अप्रत्यक्षरित्या राणेंवर टीका केली होती. त्यापाठोपाठ सिंधुदूर्गातील राणे समर्थक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर काँग्रेसमधून राणे यांची कधीही हाकालपट्टी होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यावर तुम्ही माझी काय हाकालपट्टी कराल, मीच काँग्रेस सोडतो, असे म्हणत आपला निर्णय जाहीर केला. पाठोपाठ राणेसमर्थक स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनीही आपापले राजीनामे दिले.
हेही वाचा -
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)