आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी मुंबईत मातोश्री निवासस्थानी शिवसेनेचा ‘वचननामा’ जाहीर करण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरे आणि खासदार अनिल देसाई उपस्थित होते. या वचननाम्यात महाराष्ट्रातील जनतेला १० रुपयांत सकस अन्न आणि १ रुपयांत प्राथमिक आरोग्य चाचणीचं प्रमुख वचन देण्यात आलं आहे. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना “वचननाम्यातील वचनं विचार करून देण्यात आली आहे. शिवसेना जे बोलते ते करते. राज्याच्या तिजोरीवर किती भार पडेल याचा विचार करूनच हा वचननामा तयार करण्यात आला आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
१० रूपयांमध्ये सकस अन्न कसं उपलब्ध करून देणार? या प्रश्नाचं उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, यासाठी आम्ही महिला बचतगटांची मदत घेणार आहोत. तसंच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या २०० प्राथमिक आरोग्य चाचण्या आम्ही एका रुपयांत उपलब्ध करून देणार आहोत. दुर्बल घटकातील शेतकऱ्याला प्रतिवर्ष १० हजार रुपये, यातील एकही वचन खोटं ठरणार नाही. कारण राज्याच्या तिजोरीचा विचार करूनच आम्ही हा वचननामा बनवला आहे,” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
“ मागील ५ वर्षांमध्ये तसंच जन आशीर्वाद यात्रेदरम्यान लोकांशी चर्चा करून, त्यांच्या समस्या जाणून घेत, त्यांच्या इच्छा-आकांक्षेचं संकलन करून हा वचननामा बनवलेला आहे,” असं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
Mumbai: Shiv Sena releases manifesto for the upcoming #MaharashtraAssemblyPolls, 2019. pic.twitter.com/ki5TtHKWzh
— ANI (@ANI) October 12, 2019
उपस्थित पत्रकारांनी ‘आरे’चा उल्लेख वचननाम्यात का नाही? असा प्रश्न विचारला असता, 'आरे'चा विषय मुंबईकरांसह सर्वपक्षांशी संबंधित आहे. शिवसेनेने 'आरे'तील मेट्रो कारशेडसाठी होणाऱ्या वृक्षतोडीला विरोध केलेला आहे आणि तो पुढंही राहणारच. परंतु, एकट्या शिवसेनेला जबाबदार धरण्याऐवजी सर्वपक्षांना विचारा. मग शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्षाच्या नेत्यांना उभं करा आणि एकदा आरेवर चर्चा घडवा. आमची तयारी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा -
शिवसेना-भाजपचा वेगवेगळा जाहीरनामा, ‘या’ तारखेला होणार प्रसिद्ध
मला सत्ता नको, प्रबळ विरोधी पक्ष बनवा- राज ठाकरे