Advertisement

उद्धव-शरद यांच्या भेटीमागे दडलंय काय? राजकीय चर्चांना उधाण?


उद्धव-शरद यांच्या भेटीमागे दडलंय काय? राजकीय चर्चांना उधाण?
SHARES

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट का घेतली. या दोघांच्या भेटीमागे नेमकं दडलंय तरी काय?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगत आहे. शरद पवार यांनी या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, दहा दिवसांपूर्वी घेतलेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील राजकारणाच्या सद्यस्थितीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


राजकीय वर्तुळात रंगली या भेटीची चर्चा

विशेष म्हणजे सत्तेत राहायचे की नाही याबाबत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी चर्चा केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांच राज्याच्या राजकारणात नवी राजकीय गणिते समोर येण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात रंगवल्या जात आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन ही भेट घेतली. या भेटीमध्ये ठाकरे यांनी भाजपा सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली. तसेच उद्धव ठाकरे यांची सरकारमध्ये राहण्याची मानसिकता नसल्याचे दिसत असल्याचे शरद पवार यांनी म्हटल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तुमचा निर्णय तुम्ही घ्या, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका ठरवेल, असे शरद पवारांनी सांगितल्याचे वृत्त आहे.


राणेंच्या मंत्रीपदाच्या चर्चेमुळे शिवसेनेच्या गोटात हालचाली?

काँग्रेस सोडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणाऱ्या नारायण राणे यांनी एनडीएमध्ये सहभागी होण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे अनेक नेते राणे यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यास इच्छुक आहेत. राणेंना मंत्रिमंडळात घेऊन शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. 

भाजपाच्या प्रभावातून बाहेर पडून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनी कट्टर भाजपा विरोधक असलेल्या तृणमुल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या गाठीभेटींमधून भाजपाला स्पष्ट संकेत देण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे.


कुणी कुणाला भेटावे हा निर्णय ज्याचा त्याचा त्यांनी घ्यावा. आम्ही मात्र पाच वर्ष सत्तेत राहणार. जो जो आमच्या सोबत येईल त्यांना सोबत घेऊन काम करू. राजकारणात अशा बऱ्याच भेटी होत असतात. आम्ही आमचे काम करत राहू.

- गिरीश बापट, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री


हेही वाचा - 

शरद पवारांनी उडवली नारायण राणेंची खिल्ली!

राजकारणातून निवृत्ती? प्रश्नच उद्भवत नाही- शरद पवार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा