देशात ज्या ठिकाणी निवडणुका होतात आणि त्या ठिकाणी भाजप सर्वात मोठा पक्ष ठरतो त्यावेळी नेहमीच ईव्हीएम मशीनवर खापर फोडलं जातं. त्यामुळे हा संशय दूर करण्यासाठी भाजपनं निवडणुका बॅलेट पेपरवर घेऊन विरोधकांचा ईव्हीएम मशीनबाबतचा संशय दूर करावा, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या यशाला आव्हान दिलं आहे. मंगळवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कर्नाटक निवडणुकीच्या निकालात भाजपच्या यशाबद्दल उद्धव ठाकरेंनी भाजपचं अभिनंदन केलं. तसेच यापूर्वी सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये भाजपला यश मिळताना दिसत आहे. पण भाजपशासित राज्यांतील जनतेचा खरा कौल 2019 साली कळेल. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीनं मेहनत घेतली. त्यानुसार त्यांना कमी-अधिक प्रमाणात यश मिळालं. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक नेत्याला आयुष्यात आव्हानं आणि यशापयशाचा सामना करावा लागतो, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
कर्नाटकमधील जनतेला भाजप पक्ष कसा आहे? याचा अनुभव घ्यायचा असेल. पण कोणीही अंदाज बांधू नये, निवडणुकीचे अंदाज चुकतात त्यामुळे आता कोणी धाडस करणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपची घोडदौड पूर्ण देशातील निवडणुकांमध्ये दिसत आहे. मात्र पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव होत असल्याची आठवण देखील त्यांनी करून दिली.
हेही वाचा -