'आवाज तर दणदणीत, मग तो दाबतोय कोण?' असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. ते परळ येथील शिरोडकर हाॅलमध्ये झालेल्या वृत्तपत्र विक्रेता संघाच्या कार्यक्रमात बोलत होते.
भाजपाच्या तिरंगा यात्रेला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आवाज अचानक बसला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हा आवाज भाजपाचा आहे, तो कुणीही दाबू शकत नाही, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा समाचार उद्धव ठाकरे यांनी यावेळी घेतला.
जी भूमिका घ्यायची आहे, ती मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी घेणार. सरकारमध्ये आम्ही अर्धेमुर्धे आहोत, ज्या वेळेला आम्हाला भूमिका मांडायची असते. तेव्हा ती बेधडकपणे मांडतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शिवसेना नेहमीच वृत्तपत्र विक्रेता संघाबरोबर आहे. शिवसेना काय करते हे तुम्हाला माहितीच आहे. वृत्तपत्र विक्रेता कोण आणि फेरीवाला कोण हे राजकारण्यांना कळायला हवं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. बाळासाहेबांच्या लढ्यात वृत्तपत्र विक्रेते खांद्याला खांदा लावून लढलेत याची आठवण मला आहे. त्यामुळे वृत्तपत्राचं महत्त्व कधीही कमी होऊ शकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा-
'संविधान बचाव'साठी बांधणार समविचारी पक्षाची मोट-शरद पवार