Advertisement

संजय राऊतांनी फेटाळला युतीचा ५०-५० फाॅर्म्युला

महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही आमची इच्छा आहे. ही भूमिका आम्ही जाहीरपणे मांडली आहे. यात चुकीचं काय आहे? आम्हाला कोण किती जागा देऊ करतं, हा त्या पक्षाचा निर्णय आहे. परंतु युतीसंदर्भातील निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. त्यामुळे ते जे ठरवील, तिच पक्षाची भूमिका असेल, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

संजय राऊतांनी फेटाळला युतीचा ५०-५० फाॅर्म्युला
SHARES

शिवसेना आणि भाजपामध्ये युती होणार की नाही यावर सध्या राजकीय वर्तुळातून तर्कवितर्क लढवले जात आहेत. दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमधून विस्तवही जात नसल्याचं वरवर दिसत असलं, तरी पडद्यामागे युतीसाठी हालचाली सुरू आहेत. विधानसभा आणि लोकसभेच्या निम्म्या जागांसाठी शिवसेना आग्रही असून फिफ्टी फिफ्टीचा फाॅर्म्युला ठरवला जात असल्याच्या बातम्या सध्या माध्यमांमधून जोर पकडत आहेत. असं असलं तरी, अद्याप शिवसेना-भाजपात युतीसाठी कुठलीही चर्चा सुरू झालेली नसून फिफ्टी फिफ्टीचा फाॅर्म्युला हा निव्वळ प्रसार माध्यमाच्या मनातील आकडा असल्याचा खुलासा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला.


काय म्हणाले राऊत ?

भाजपासोबत युती करण्यासाठी शिवसेना निम्म्या जागांसाठी आग्रही असल्याचं वृत्त फेटाळून लावताना राऊत म्हणाले की, ''युतीच्या संदर्भात अशी कुठलीही चर्चा वा वक्तव्य शिवसेनेच्या नेत्याने केलेलं नाही. अथवा सामना या मुखपत्रातून देखील शिवसेनेने तसं जाहीर केलेलं नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही आमची इच्छा आहे. ही भूमिका आम्ही जाहीरपणे मांडली आहे. यात चुकीचं काय आहे? आम्हाला कोण किती जागा देऊ करतं, हा त्या पक्षाचा निर्णय आहे. परंतु युतीसंदर्भातील निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. त्यामुळे ते जे ठरवील, तिच पक्षाची भूमिका असेल'', असं राऊत यांनी स्पष्ट केलं.


उद्धव यांच्या भाषणाकडे लक्ष

काही दिवसांपूर्वीच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपा नरमल्याचं दिसत आहे. त्यामुळेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात शिवसेनेसोबत लढायचं, असा पवित्रा घेतला आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपाला कोंडीत पकडून शिवसेना विधानसभेसाठी २८८ पैकी १४४ आणि ४८ पैकी २४ जागांसाठी आग्रही असल्याची माध्यमांमध्ये चर्चा आहे. ही चर्चा कितपत खरी ठरते किंवा शिवसेनेची याबाबत काय भूमिका आहे, हे जाणून घेण्यासाठी राजकीय विश्लेषकांचं लक्ष उद्धव ठाकरे यांच्या पंढरपूरमधील भाषणाकडे लागलं आहे.



हेही वाचा-

आघाडीत बिघाडी अशक्य, शरद पवार यांनी केलं ट्विट

चलो पंढरपूर...सोमवारच्या सभेसाठी सेनेकडून जय्यत तयारी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा