निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीची नुकतीच घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर बिहार निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून सुशांत सिंह राजपूतचा मुद्दा उचलून धरत मुंबई आणि महाराष्ट्रावर सातत्याने टीका करणाऱ्यांना शिवसेना प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक टोला हाणला आहे. (shiv sena mla pratap sarnaik reacts on bihar assembly election during covid 19 pandemic)
बिहारच्या निवडणुकीचा निकाल, सुशांत सिंग केसचा निकाल व एनसीबी चा अहवाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार. तसंच अमेरिकेतील निवडणुका व कोविडची लस आहेच. त्यानंतर मात्र मुंबईवरचं प्रेम उफाळून येईल. तोपर्यंत ज्या व्यक्तींवर, कलाकारांवर आरोप होतील, त्यांनी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, अशा शब्दांत प्रताप सरनाईक यांनी ट्विट केलं आहे.
हेही वाचा - राजकारणात जाण्यासाठीच ‘त्यांच्या’कडून महाराष्ट्राची बदनामी- संजय राऊत
बिहारच्या निवडणुकीचा निकाल, सुशांत सिंग केसचा निकाल व एनसीबी चा अहवाल 10 नोव्हेंबरला जाहीर होणार. तसेच अमेरिकेतील निवडणुका व कोविडची लस आहेच. त्यानंतर मात्र मुंबई वरचे प्रेम उफाळून येईल. तोपर्यंत ज्या व्यक्तींवर, कलाकारांवर आरोप होतील त्यांनी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.
— Pratap Sarnaik (@PratapSarnaik) September 25, 2020
अभिनेता सुशांत सिंह राजपूतआत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीस जाणीवपूर्वक तपासात दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मुंबई पोलीसआणि राज्य सरकारवर विरोधकांकडून करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणात शिवसेना नेत्याला गोवण्याचा प्रयत्न देखील झाला. पाठोपाठ मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करून कंगना रणौतने नवा वाद तयार केला. यावरून सत्ताधारी शिवसेना आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेत्यांकडून यथेच्छ टीका करण्यात आली.
बिहार विधानसभा निवडणुका तोंडावर असताना बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच घेतलेली स्वेच्छानिवृत्ती चांगलीच चर्चेत आली आहे. त्यावर जे लोक महाराष्ट्राला बदनाम करत आहेत ते राजकारणात जात आहेत. हा प्रकार महाराष्ट्राला सुनियोजीतपणे बदनाम करण्यासाठीच असल्याचा, दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.
बिहारमध्ये कोरोना संपलाय का? सरकारला आणि तिकडच्या राज्यकर्त्यांना, निवडणूक आयोगाला वाटत असेल की कोरोना संपला तर मग तसं जाहीर करा, असं देखील संजय राऊत यांनी सुनावलं आहे.