पालघर पोटनिवडणुकीपासून सुरू झालेला भाजपा-शिवसेना असा सामना निकालानंतरही सुरू राहिल ही शक्यता अखेर खरी ठरली आहे. भाजपाचा विजय हा भाजपाचा नसून तो निवडणूक आयोगाचा विजय असल्याची पहिली तिखट प्रतिक्रिया शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून आली. सेनेकडून पराभव मान्य करून काही मिनिटं उलटत नाहीत तोच सेनेनं भाजपाच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वादाचा सामना सुरूच ठेवला आहे.
पोटनिवडणुकीतील मतमोजणीत तफावत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेनं केला आहे. त्यानुसार सेनेनं निवडणूक आयोगाकडं रितसर तक्रार केली आहे.
गुरुवारी झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भाजपानं मुसंडी मारत पालघरचा किल्ला अाबाधित ठेवला आहे. भाजपाच्या राजेंद्र गावित यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वानगा यांचा २९.५७४ मतांनी पराभव केला. पहिल्यांदाच पालघर पोटनिवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेनं हा पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळं हा पराभव नक्कीच शिवसेनेच्या जिव्हारी लागला असण्याची शक्यता आहे.
ईव्हीएम मशीन घोळाचा मुद्दा एेरणीवर असून शिवसेनेनं मताच्या विभाजनाबरोबरच ईव्हीएमच्या घोळालाही पराभवासाठी जबाबदार धरलं. त्यामुळंच गावित विजयी झाल्याबरोबर मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सुभाष देसाई आणि संजय राऊत यांची विचारमंथन बैठक पार पडली.
या बैठकीनंतर शिवसेनेनं २० ते २४ मतमोजणीमध्ये घोळ झाल्याची आणि मतांमध्ये तफावत असल्याची रितसर तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे आता या तक्रारीची निवडणूक आयोग नेमकी काय दखल घेते हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हेही वाचा -