जय हिंद! जय बांगला म्हणत शिवसेनेने चक्क पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी रणशिंग फुंकलं आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या बाबतची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे प.बंगालमध्ये कुठलीही ताकद नसतानाही शिवसेना या राज्यात निवडणूक लढणार आहे. अशा प्रसंगी सध्या अडचणीत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसकडून शिवसेनेला मदत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'बहुप्रतीक्षित माहिती घेऊन मी आलो आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर शिवसेनेने पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही लवकरच कोलकाता इथं दाखल होत आहोत. जय हिंद, जय बांगला!
हेही वाचा- बिहारच्या निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा, ‘नोटा’पेक्षाही कमी मतं
So, here is the much awaited update.
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 17, 2021
After discussions with Party Chief Shri Uddhav Thackeray, Shivsena has decided to contest the West Bengal Assembly Elections.
We are reaching Kolkata soon...!!
Jai Hind, জয় বাংলা !
सुशांत सिंह राजपूत प्रकरण, मुंबई विरूद्ध परप्रांतीय असे मुद्दे पुढं आल्यानंतर शिवसेनेने बिहारमध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शिवसेनेला चांगला फायदा मिळेल, अशी अपेक्षा जाणकार व्यक्त करत होते. त्यानुसार शिवसेनेने (shiv sena) या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी एकूण २२ उमेदवार उभे केले होते. हे सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत झाले. एवढंच नाही, तर शिवसेनेला ‘नोटा’पेक्षा देखील कमी मते मिळाली. बहुतेक सर्वच उमेदवारांचं डिपाॅझिटही जप्त झालं.
महाराष्ट्राबाहेर निवडणूक लढवण्याचा फारसा चांगला अनुभव पाठिशी नसताना देखील शिवसेनेने पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. सध्या प.बंगालमध्ये भाजपचा जोर वाढतानाच दिसत आहे. अशा अवघड स्थितीत ममता बॅनर्जी यांचा एक एक शिलेदार तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडत असल्याने त्या एकाकी पडत चालल्या आहेत. महाराष्ट्रात एकमेकांचे कट्टर वैरी असलेल्या शिवसेनेने भाजपविरोधात आघाडी उघडत पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवल्यास त्याचा अप्रत्यक्षरित्या तृणमूल काँग्रेसला फायदा होऊ शकतो.
“दुश्मन का दुश्मन दोस्त” या न्यायाने तृणमूल काँग्रेसकडून शिवसेनेला मदत देखील होऊ शकते. येत्या ३० मे रोजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा कालावधी संपुष्टात येत आहे. त्यानंतर पुढील सर्व भवितव्य मतदारांच्याच हाती असणार आहे. तेव्हा शिवसेनेच्या येण्याने भाजपचं जितकं नुकसान होईल, तेवढाच फायदा कदाचित तृणमूलला होऊ शकतो.
हेही वाचा- महाराष्ट्र कुठेही नेला असो, पण बिहार...अमृता फडणवीसांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं