वंचित बहुजन आघाडी आणि ‘एमआयएम’मध्ये सध्या कुठल्याही प्रकारची जागा वाटपाची बोलणी सुरू नाही. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या भोवती काही आरएसएसच्या विचारांचा पगडा असलेली लाेकं जमा झाल्याने ही आघाडी होण्यात अडथळा येत आहे. आंबेडकर यांना काँग्रेससोबतच वाटाघाटी करायच्या होत्या, तर वंचितची गरजच काय? असा प्रश्न उपस्थित करत ‘एमआयएम’चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी किमान ५० जागा देणार असाल, तरच ‘वंचित’सोबत जाण्याचा विचार करू, अन्यथा नाही, असं स्पष्ट केलं.
वंचित बहुजन आघाडीसोबतच जागा वाटपाच्या तिढ्यावर खुलासा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जलील म्हणाले की, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी किंवा माझ्यासोबत वंचितची जागा वाटपाची कुठलीही चर्चा सुरू नाही. लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळल्याने पुन्हा एकत्रित निवडणूक लढवण्याचं दोन्ही पक्षामध्ये ठरलं होतं. त्यानुसार जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी सर्वात आधी ओवेसी आणि आंबेडकर यांच्या दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत एमआयएमकडून ९८ जागांची यादी आंबेडकर यांच्यासमोर ठेवण्यात आली होती. त्यात सुधारणा करून ७४ जागांची यादी आंबेडकर यांनी ई-मेल ने पाठवण्यात आली.
पण या जागांसंदर्भात आंबेडकर किंवा त्यांच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांकडून आम्हाला उत्तर मिळालं नाही. त्यानंतर काही दिवसांनी वंचितकडून आम्हाला एक ई-मेल आला त्यात जागा कमी करण्याची विनंती करण्यात आली. त्यापुढं पुण्यात ओवेसी आणि आंबेडकर यांच्यात ३ तास बैठक झाली. या बैठकीनंतर आंबेडकर यांच्याकडून ओवेसी यांना एक मेसेज आला. या मेसेजमध्ये ८ जागा देऊ असं कळवण्यात आलं.
७४ जागांवर तडजोड करण्याची आमची तयारी होती. पण पुढं आंबेडकर यांच्याकडून कुठलाच संपर्क साधण्यात आला नाही. आंबेडकर थेट ओवेसी यांच्यासोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असल्याचं म्हणतात. पण तसं काहीही नाही. मी प्रदेशाध्यक्ष असून माझ्याशीही त्यांची चर्चा सुरू नाही. त्यामुळे त्यांची एमआयएमच्या कोणत्या पदाधिकाऱ्यासोबत चर्चा सुरू आहे, हे त्यांनी सांगावं. पक्ष म्हणून आमचंही अस्तित्व आहे. त्यामुळे आम्ही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच विधानसभेसाठी उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यास सुरूवात केली आहे, अशी माहिती ओवेसी यांनी दिली.
हेही वाचा-
काँग्रेससाेबत युती नाहीच, स्वबळावर लढवणार निवडणूक - प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीत फूट, एमआयएम स्वबळावर लढणार