रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी न्याल का? मग अशाच स्थितीत तुम्ही मंदिरात जाऊन देवाची प्रार्थना कशी काय करू शकाल? असं वादग्रस्त वक्तव्य करत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे.
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशन आणि ऑबझर्व्हर्स रिसर्च फाऊंडेशनच्या परिषदेत इराणी यांना शबरीमाला मंदिर प्रवेशासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर इराणी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
केरळच्या शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असली तरी अनेक संघटना आणि स्थानिक या निर्णयाला विरोध करत आहेत. गेल्या आठवड्यात मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतरही महिलांना मंदिरात प्रवेश करू देण्यात आला नव्हता.
- महिलांना मासिक पाळी येणं ही अतिशय नैसर्गिक बाब आहे. परंतु तुम्ही मित्राच्या घरी रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स नेऊ शकता का? मग देवाच्या मंदिरात तुम्ही त्या अवस्थेत कसं काय जाल?
- मंदिरात जाऊन प्रार्थना करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. परंतु मासिक पाळी आल्यावर तशाच अवस्थेत तुम्ही मंदिरात जाऊन प्रार्थना कशी काय करू शकाल? त्यासाठी हट्ट करण्याचं कारण काय?
- अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने महिलांना मंदिर प्रवेशाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री म्हणून त्यावर मत नोंदवू शकत नाही.
मी हिंदू असले तरी एका पारशी माणसाशी लग्न केलं आहे. मी माझ्या मुलांना झोराष्ट्रीयन परंपरा शिकवत आहे. जेव्हा मी माझ्या मुलाला घेऊन अंधेरीतील अग्यारीत जाते, तेव्हा अग्यारीच्या आत ते दोघेच जातात आणि मी रस्त्यावर किंवा कारमध्ये थांबून त्यांची वाट पाहते. कारण अग्यारीत पारशी धर्मियांशिवाय कुणालाही आत न सोडण्याचा नियम आहे.
इराणी यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा-
२०१९ मध्ये भाजपाची सत्ता जाणार- पवार
युती करा नाहीतर एकत्रित निवडणुकांना सामोरे जा, अमित शहांचा शिवसेनेला इशारा