काश्मीरमध्ये तैनात सैनिकांवर दगडफेक करणाऱ्या तरुणांवरील गुन्हे मागे घेतले जातात. तर महाराष्ट्र बंदमध्ये सामील झालेल्या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेतले का जात नाहीत? असा प्रश्न उपस्थित करीत मराठा समाजातील महिला कार्यकर्त्यांनी गुरूवारपासून आझाद मैदानात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन पुकारण्यात आलं होतं. या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसेचं गालबोट लागल्याने आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देऊनही ते पाळण्यात न आल्याने या महिलांनी आंदोलन सुरू केल्याचं सांगितलं.
''मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट असल्याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. परंतु ज्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्ण करू शकतात, त्याच मागण्यांसाठी आम्ही हे ठिय्या आंदोलन पुकारलं आहे. मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या तरूणांना घरातून उचलून नेत पोलिस आजही अमानुषपणे मारहाण करत आहेत. परभणीत तर महिला कार्यकर्त्यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण करण्यात आली. या पोलिसांविरोधात मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करावी. तसंच आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावेत, अशी आमची प्रमुख मागणी आहे'', असं आंदोलनकर्त्या रूपाली पाटील म्हणाल्या.
या आंदोलनात कराड, पुणे, सोलापूर आणि विविध जिल्ह्यांतील महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर मराठ्यांचा गनिमी कावाही मुख्यमंत्र्यांना पाहायला मिळेल, असा इशारा आंदोलनकर्त्या महिलांनी दिला आहे.
हेही वाचा-
मराठा मोर्चा पुन्हा उपसणार आंदोलनाचं हत्यार
हिंसक मराठा आंदोलकांवर कारवाई करा! उच्च न्यायालयात याचिका दाखल