शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी (१६ जून) खासदार संजय राऊत यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. आदित्य यांनी शिवसेनेचे नेते असल्याच्या दृष्टिकोनातून आपलं काम सुरू केलं आहे. ते युवकांमध्ये जोर लावून काम करत आहे. याकडे पाहता त्यांच्यात राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचं राऊत म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येचा दौरा करणार आहेत. उद्धव ठाकरेंबरोबर शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदारही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य यांनी एक दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी दुष्काळग्रस्तांचे प्रश्न नीटपणे समजावून घेतले. शिवसेनेचे नेते या दृष्टिकोनातून ते या प्रश्नांवर काम करत आहेत. यावरून त्यांच्यात राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, हेच दिसून येत, असं राऊत म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच आदित्य यांनी माहीम आणि वरळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यावरुन आदित्य विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने मतदारसंघाची चाचपणी करत असल्याची चर्चा रंगली होती.
त्यातच शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रीपदाची मागणी करण्यात येत असल्याने शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यास आदित्य हे पद स्वीकारतील का? असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राऊत म्हणाले होते की, उपमुख्यमंत्रीपद हे ठाकरे कुटुंबातील व्यक्तीसाठी अत्यंत छोटं आहे. याउलट तरुणांचे नेते म्हणून आदित्य यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. आदित्य यांच्या कार्यपद्धतीविषयी तरुणांमध्ये एक जबरदस्त आकर्षण आहे. आदित्य यांच्या रुपात एका युवा नेतृत्वाच्या हातात राज्य द्यावं असं जनतेला वाटतं आणि त्यादृष्टीने त्यांची जडणघडणही सुरू आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी देखील आदित्य यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं, त्यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता असून ते मुख्यमंत्री झाले तर आपल्याला आवडेल असं मत व्यक्त केलं होतं.
हेही वाचा-
आदित्य विधानसभा लढवण्याचे संकेत, मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर राहणार नजर
उदयनराजे भडकले, म्हणाले मी चक्रम आहे, पण जनतेसाठी...