भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य असलेल्या परळ येथील बीआयटी चाळीतील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली. डाॅ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दादर येथील चैत्यभूमी तसंच वरळीतील बीआयटी चाळीला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी ही घोषणा केली.
हेही वाचा- महापरिनिर्वाण दिन: लाखो आंबेडकर अनुयायी चैत्यभूमीवर दाखल
बीआयटी चाळ क्र. १ मधील खोली क्रमांक ५० आणि ५१ अशा दोन खोल्यांमध्ये डाॅ. आंबेडकर यांचं कुटुंब १९१२ ते १९३४ असे २२ वर्षे वास्तव्याला होतं. याच कालावधीत डाॅ. आंबेडकर यांचा महामानव होण्याचा प्रवास सुरू झाला. आर्थिक हालाखी, सामाजिक विषमतेशी झगडा देत डाॅ. आंबेडकर याच निवासस्थानी राहून उच्च शिक्षणाची एक एक पायरी वर चढत गेले. त्या दृष्टीकोनातून या वास्तूला खूपच महत्त्व आहे.
मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांनी आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची घोषणा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १९१२ ते १९३४ या कालावधीत २२ वर्षे परळ येथील निवासस्थानी वास्तव्य होते.#BabaSahebAmbedkar pic.twitter.com/LlfRNHDGbC
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 6, 2019
या वास्तूला राष्ट्रीय स्मारकात रुपांतरीत करताना सर्वात आधी या दोन खोल्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या कुटुंबाचं योग्य पुनर्वसन करावं लागेल. त्यानंतर डाॅ. आंबेडकरांच्या अमूल्य वस्तूंचं जतन करून या वास्तूचं स्मारकात रुपांतरण करावं लागेल.