मुंबईत टॅक्सीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना येत्या काळात या प्रवासासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागण्याची शक्यात आहे. कारण, टॅक्सी संघटनांनी २५ रुपये भाडेवाढीची मागणी केली आहे. परिवहन विभाग, टॅक्सी संघटना आणि मुंबई ग्राहक पंचायत यांची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीत ही मागणी करण्यात आली आहे. तसंच, येत्या मंगळवारी या भाडेवाढीवर पुन्हा चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येतं आहे.
शुक्रवारी या बैठकीत परिवहन सचिव आशीष सिंह, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, मुंबई टॅक्सीमेन्स युनियननं सरचिटणीस ए. एल. क्वाड्रोस, मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष शिरीष देशपांडे उपस्थित होते. यावेळी सीएनजीच्या दरात ऑगस्ट २०१७ पासून आतापर्यंत ५ वेळा झाली आहे. ही वाढ पाहता मुंबई टॅक्सीमेन्स युनियननं ३० रुपये भाडेवाढीची मागणी परिवहन विभागाकडं केली. त्याशिवाय, या बैठकीत भाडे निश्चितीसाठी २०१७ साली नेमलेल्या खटुआ समितीच्या शिफारसींवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी टॅक्सी संघटनेनं '३० रुपये भाडेवाढीच्या ऐवजी २५ रुपये तरी भाडेवाढ द्या', अशी मागणी केली.
भाडेवाढ केल्यास खटुआ समितीतील अन्य प्रवास सवलती मात्र त्वरित लागू करू नका, असंही म्हटलं. मात्र, यावर ग्राहक पंचायतीनं आक्षेप घेतला. यावेळी भाडेवाढीला विरोध नसल्याचं सांगत भाडेवाढ दिली तर खटुआ समितीच्या शिफारसीनुसार, ८ किलोमीटरच्या प्रवासात १५ ते २० टक्के प्रवास सवलत आणि दुपारी १२ ते सायंकाळी ४ वेळेत १५ टक्के प्रवास सवलत लागू करण्याची मागणी केली. यावर परिवहन विभागानं दोघांनाही लेखी निवेदन सोमवापर्यंत सादर करण्यास सांगितलं आहे.
या बैठकीत परिवहन विभागानं भाडेवाढीच्या चर्चेसाठी फक्त टॅक्सी संघटनांना आमंत्रित केलं. मात्र, अद्याप रिक्षा संघटनांना बोलावलं नसल्याचं ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितलं. परंतु, ४ ते ६ रुपयांपर्यंत भाडेवाढ न मिळाल्यास ९ जुलैपासून रिक्षा चालक-मालक संघटनांनी बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, रिक्षांच्या भाडेवाढीवरही लवकरच चर्चा होणार असल्याचं समजतं.
हेही वाचा -
एमसीएनं थकविला राज्य सरकारचा १२० कोटींचा महसूल
मंत्रालयात दूषित पाण्यानं १००हून अधिक कर्मचाऱ्यांना उलट्या व जुलाब