बेस्टच्या तिकीटदरात कपात केल्यामुळं पहिल्याच दिवशी तब्बल ५ लाख प्रवाशांची वाढ झाली आहे. ही वाढ ३० टक्क्यांपर्यंत गेली आहे. मात्र, प्रवासी संख्या वाढली असली तरी, उत्पन्नात घट झाली आहे. बेस्टचे ५ लाख २ हजार ८१३ प्रवासी वाढले. परंतु, ६६ लाख ९८ हजारांनी उत्पन्न घटलं आहे. दरम्यान, बेस्टनं तिकीट दर कमी केल्यानं बसमध्येही प्रवाशांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. त्याशिवाय बस थांब्यांवरही मोठ-मोठ्या रांगा लागत आहे.
बेस्ट उपक्रमानं साध्या बसचा प्रवास किमान ५ आणि एसी बसचा प्रवास किमान ६ रुपये जाहीर केल्यानं बेस्टच्या बसगाड्या भरत आहेत. स्वस्त तिकीटदरामुळं प्रवासी रिक्षा, टॅक्सीकडं पाठ फिरवत पुन्हा बेस्टकडं वळत असल्याचं पाहायला मिळत आहे. ८ जुलैला १७ लाख १५ हजार ४४० मुंबईकरांनी प्रवास केला. मात्र, प्रवासी भाड्यात कपात केल्यानंतर ९ जुलै रोजी तब्बल २२ लाख १८ हजार २५३ लोकांनी प्रवास केला.
बेस्टला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बेस्टमध्ये भाड्यानं गाड्या आणून ताफा वाढवण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर प्रवाशांना बेस्टकडे वळवण्यासाठी बेस्टच्या तिकिटदरात कपात करून किमान ५ रुपये तिकीट करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची मंगळवारपासून अंमलबजावणी सुरू झाली. भाडेकपातीमुळं प्रवाशांमध्ये प्रचंड उत्साह पाहयला मिळतो आहे. मात्र, बेस्ट गाड्यांचा ताफा वाढेपर्यंत हे प्रवासी टिकवून ठेवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -
पावसाळ्यात फिरायला जायचंय? मग या ५ ठिकाणी अनुभवा मजा, मस्ती आणि थ्रिल
शालेय विद्यार्थ्यांना मिळणार खिचडीऐवजी ज्वारी, बाजरीची भाकर