वाढलेल्या इंधन दरामुळं प्रवासखर्चात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य कुटुंबीयांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. अशातच सामान्य नागरिकांना लोकल प्रवासासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. सर्वांना लोकलमुभा दिल्यास गर्दी वाढू शकते, तसंच, कोरोना पुन्हा वाढण्याची भीती आहे. ही भीती रेल्वे-महापालिका अधिकारी यांनी व्यक्त केल्याने तूर्त सामान्य नागरिकांना जलमय-खड्डेमय रस्त्यावरूनच प्रवास करावा लागणार आहे.
शहरात मान्सूनचे आगमन झाल्यापासून मुसळधार पावसामुळे रस्त्यांसह रेल्वे स्थानकेही जलमय झाल्याने मोठी अवघड स्थिती निर्माण होत आहे. रेल्वे स्थानके, रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने अनेक लोकल खोळंबल्या. लोकलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे.
रेल्वेच्या आकडेवारीनुसार सध्या ३० लाखांपेक्षा अधिक अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी रोज रेल्वेने प्रवास करत आहेत. अशा वेळेस सर्वांना लोकलमुभा दिल्यास गर्दीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल; शिवाय त्यांच्या प्रवासाच्या अडचणीही वाढतील.
शहरातील कोरोना बाधितांचा टक्का ४.४० इतका आहे. यामुळे अत्यंत सावधगिरी बाळगून महापालिका काम करत आहे. शहरातील अतिवृष्टीचा इशारा मागे घेतल्यानंतर सामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा विचार करण्यात येईल. तोपर्यंत सर्वसामान्यांना संयम ठेवावा लागणार आहे.
कल्याण, ठाणे, डोंबिवली, बोरिवली, अंधेरी मालाड येथून मुंबईत कामासाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सध्या हा नोकरदार वर्ग रस्तेप्रवासावरच अवलंबून आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचत असल्याने रस्तेमार्गे प्रवास करताना तासनतास खोळंबून रहावे लागते. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
हेही वाचा -
प्राप्तिकर विभागाचे नवीन ई-फाईलिंग पोर्टल सुरू, मिळतील 'हे' फायदे
फक्त गृहकर्जच नव्हे, तर पर्सनल लोनवरही मिळते कर सूट; हा आहे नियम