न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर एसटी कामगार आता पुन्हा कामावर रुजू होत आहेत. त्यामुळे एसटीची सेवा पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे.
राज्यातील सुमारे ५० टक्क्यांहून अधिक संपकरी एसटी कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. एकूण ८१ हजार कर्मचाऱ्यांपैकी गुरुवारपर्यंत ४१ हजार ४६२ कर्मचारी कामावर रुजू झालेत. कोर्टाच्या आदेशानंतर कर्मचाऱ्यांना तातडीनं सेवेत पाठवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात १६ हजार एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत.
गेल्या सहा महिन्यांपासून एसटीची सेवा बंद होती. त्यामुळे एसटी महामंडळाला मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले. मात्र आता, एसटीची सेवा हळुहळू सुरू झाल्यानं महामंडळाला रोज १३ कोटींचे उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली आहे.
संपाच्या काळात महामंडळानं बडतर्फ केलेल्या अकरा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याची संधी देण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे, अशा कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन त्याबाबत परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिलेल्या आदेशानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.
२८ ऑक्टोबर २०२१ पासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. ८६ हजार ५५८ कर्मचारी संपात सहभागी झाले होते. संपामुळे राज्यातील एसटी सेवा ठप्प झाली. संपकाळात समाजातील सर्वच प्रवासीवर्ग खासगी वाहनांच्या जात्यात भरडून निघाला. त्यातच कोरोनानिर्बंध हटल्याने शाळा सुरू झाल्या. विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी घेऊन संपकऱ्यांना कामावर हजर राहण्याच्या सूचना दिल्या.
हेही वाचा