दिवाळीत गावाला आणि पर्यटनासाठी जाण्याचा प्लान करणाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा (एसटी)ने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरदरम्यान तब्बल ९३२० जादा फेऱ्या एसटीकडून सोडण्यात येणार असल्याचं एसटीचे अध्यक्ष आण परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केलं आहे. मुंबईतील विविध एसटी आगारातूनही जादा फेऱ्या सुटणार आहेत.
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी आणि पंढरपूर वारीसाठी एसटीकडून दरवर्षी जादा गाड्या सोडल्या जातात. तर दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतही प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता जादा एसटी गाड्या सोडल्या जातात. त्यानुसार यंदाही एसटीनं ९३२० जादा गाड्या सोडण्याचं ठरवलं आहे. ज्या मार्गावर प्रवाशांची संख्या अधिक असते अशा मार्गावर जादा फेऱ्या चालवण्यात येतील. तसे आदेश सर्व एसटी आगारांना देण्यात आले आहेत.
जादा फेऱ्यांसह दिवाळीच्या काळात एसटीचे सर्व आगार, बस स्थानक सुशोभित करण्यात येणार आहेत. मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त वाहतूक होणार असल्याने गाड्यांमधील बिघाड आणि अपघात टाळण्यासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत त्वरीत मदत करण्यासाठी फिरती दुरूस्ती-गस्त पथकं तैनात करण्यात येणार आहेत. प्रवाशांना पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुंबई प्रदेशाचा विचार करता मुंबईतील विविध आगारातून १ नोव्हेंबरपासून दर दिवसाला ११४ जादा फेऱ्या सुटणार आहेत. राज्याच्या विविध भागांसाठी या जादा फेऱ्या असणार असून २० नोव्हेंबपर्यंत या जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. त्यानुसार मुंबई प्रदेशातून २० दिवसांत २२८० जादा फेऱ्या सुटणार असल्याची माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळं मुंबईकरांनो, दिवाळीत गावी आणि पर्यटनासाठी एसटीनं जाण्याचा प्लॅन करत असाल तर लवकरात लवकर आपलं तिकीट आरक्षित करा.
हेही वाचा-
रिक्षा-टॅक्सीपाठोपाठ अाता एसटीलाही हवीय भाडेवाढ
तंबाखू खाल्ल्यास होईल शिस्तभंगाची कारवाई, एसटी प्रशासनाचा कर्मचाऱ्यांना दट्ट्या