रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सर्व लोकल गाड्या १५ डब्यांच्या करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच येत्या २ आठवड्यांत यासंदर्भातील अभ्यास अहवाल सादर करण्याचे निर्देश मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. लोकलमधील वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वेमंत्र्यांचा हा विचार स्तुत्य असला, तरी प्रत्यक्षात सर्व लोकल १५ डब्यांच्या होणं कठीण असल्याचं म्हटलं जात आहे. कारण या सर्व लोकल थांबण्यासाठी प्लॅटफाॅर्मची लांबीच अपुरी आहे.
सीएसएमटी स्थानकात मध्य रेल्वेच्या १५ डब्याच्या लोकल थांबवण्यासाठी केवळ ६ नंबरचा एकच प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील १५ डब्यांच्या लोकलला चर्चगेट स्थानकात थांबवण्यासाठी ४ नंबरचा एकच प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. तसंच, १५ डब्यांच्या लोकलकरीता याठिकाणी लांबी वाढविण्यासाठी जागा उपलब्ध नसून चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान देखील प्लॅटफॉर्म वाढविण्यासाठी जागा उपलब्ध नाही.
सद्यस्थितीत मुंबईत बहुतांश लोकल या १२ डब्याच्या असून त्याची प्रवासी क्षमता २४०० इतकी आहे. तर १५ डब्याच्या लोकलची प्रवासी क्षमता ३००० इतकी आहे. सर्व लोकल १५ डब्यांच्या केल्यास प्रवासी क्षमता २५ टक्क्यांनी वाढेल.
ऑक्टोबर २०१२ पासून मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कल्याण जलद मार्गावर १५ डब्यांची लोकल धावते. तसंच पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते विरार दरम्यान जलद मार्गावर १५ डब्यांची लोकल धावते.
मध्य रेल्वेवर कल्याण ते खोपोली आणि कल्याण ते कसारा या मार्गावर १५ डब्यांच्या गाड्यांसाठी ४६० कोटींचा प्रकल्प विचाराधीन आहे. तर पश्चिम रेल्वेच्या अंधेरी ते विरार स्लो कॉरिडॉरमध्ये १५ डब्यांची लोकल चालविण्यासाठी ७० कोटींची योजना रेल्वेने आखली आहे. याकरीता पश्चिम रेल्वेच्या १४ स्थानकांतील एकूण ३१ फलाटांची लांबी वाढवावी लागणार आहे.
लोकलमधील वाढती गर्दी पाहता १२ डब्याच्या लोकल १५ डब्याच्या केल्या, तर प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होईल. रेल्वे मंत्र्यांच्या या निर्णयाची मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लवकरात लवकर अंमलबजावणी करणं गरजेचं आहे.
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संघ (महासंघ)
हेही वाचा-
नव्या एसी लोकलसाठी आणखी प्रतीक्षा!
मुंबईतील सर्व लोकल होणार १५ डब्यांच्या!