Advertisement

एल्फिन्स्टन दुर्घटनेला महिना लोटला..परिस्थिती मात्र जैसे थेच!


एल्फिन्स्टन दुर्घटनेला महिना लोटला..परिस्थिती मात्र जैसे थेच!
SHARES

अफवांमुळे एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीला २९ ऑक्टोबरला एक महिना पूर्ण झाला. २९ सप्टेंबरला एल्फिन्स्टन रोड आणि परळला जोडणाऱ्या पादचारी पूलावर अफवा पसरून २३ निष्पाप जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेला जबाबदार कोण? कोणी पसरवली अफवा? असे बरेच प्रश्न त्यावेळी विचारण्यात आले. पण, ती घटना घडल्यानंतर त्या घटनेचे अजूनही बरेच घाव, जखमा त्यांच्या मनात आहेत, ज्यांनी ही घटना स्वत: अनुभवली.

या घटनेत कोणी आपला भाऊ गमावला, तर कोणी आपली आई गमावली. माहितही नव्हतं की सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेलेली माणसं पुन्हा आपल्याला कधीच दिसणार नाहीत. एवढं सर्व होऊनही रेल्वेची परिस्थिती मात्र अजूनही आहे तशीच आहे.


दुर्घटनेचं खापर पावसावर फोडलं

२९ सप्टेंबरला एल्फिन्स्टन रोड स्टेशन पूलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वे प्रशासनाने रेल्वे अधिकाऱ्यांना क्लिन-चिट देऊन पाऊस आणि अफवेमुळे ही दुर्घटना घडल्याचं चौकशी समितीच्या अहवालात नमूद केलं. या दुर्घटनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून सुरक्षा ऑडिट घेण्यात आलं. पण, अजूनही अनेक स्थानकांची स्थिती जैसे थेच आहे. ऑडिट घेतल्यानंतर त्याचा रिपोर्टही सादर करण्यात आला. पण, त्यावर अंमलबजावणी कधी होणार? 

ऑडिटदरम्यान, स्थानकांवरील स्थिती, पादचारी पूल, चढ-उतार करताना प्रवाशांची होणारी ससेहोलपट, स्कायवॉकची उपयुक्तता, प्रवेशद्वाराकडील स्थिती, स्थानकांशी जोडलेले रस्ते, तिथल्या अडचणींची पाहणी करण्यात आली. या अपघातानंतर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या आदेशानुसार वेगवेगळे चमू तयार करून ऑडिट करण्यात आलं. तसेच, यामध्ये परळ टर्मिनस जलद गतीने उभारणं ही बाब प्राध्यान्याची असल्याचा निर्वाळाही देण्यात आला होता.


काय झालं नियोजनाचं?

पण, या सर्व कामांमध्ये कोणतंही काम अजून पूर्ण झालेलं नाही. तर, रेल्वे स्थानकांवरील फलाट आणि गाडीदरम्यानच्या पोकळीचा मुद्दाही अजून तसाच आहे. उपनगरीय स्थानकांतील ११६ फलाटांची उंची वाढवणं अजूनही रेल्वेला जमलेलं नाही. २०१६ पासून आतापर्यंत २८ प्रवाशांचा या पोकळीत अडकून जीव गेला आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने सर्व स्थानकांतील फलाटांची उंची वाढवण्याचे आदेशही रेल्वेला दिले होते. पण, आतापर्यंत मध्य रेल्वेवरील २७३ फलाटांपैकी १६८ फलाटांचीच उंची वाढवण्यात आली आहे.


मध्य रेल्वेची आश्वासनं हवेतच विरली...

मध्य रेल्वेच्या कल्याण ते कर्जत-कसारा सेक्शनमध्ये रूळांच्या क्रॉसिंगमध्ये बदल करण्यात येणार असून यार्ड रिमॉडेलिंगची कामे हाती घेण्यात आली असल्याचं ही सांगण्यात आलं आहे. पत्री पुलाजवळ कसारा दिशेला ३० मीटरचा उड्डाणपूल बांधण्याचं नियोजन आहे. त्यामुळे लोकलसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होऊन प्रवाशांची नेहमी होणारी लटकंती टळणार असल्याचंही मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.



हेही वाचा

...तर एलफिन्स्टनवरची चेंगराचेंगरी टळली असती!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा