वाढत्या गर्दीत प्रवाशांना सुविधा देण्यासाठी बोरीवली, मालाड, गोरेगाव स्थानकातून विशेष लोकल सोडल्या जातात. यातीलमालाड, गोरेगाव येथून सुटणाऱ्या लोकल जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर थांबवण्यात येतात. पण, गर्दीच्या वेळेस या स्थानकावरुन लोकल पकडणं किंवा उतरणं प्रवाशांना जिकिरीचं होतं. त्यामुळे जोगेश्वरी रेल्वे स्थानकातूनही एक ‘विशेष लोकल सुरू करा’, असा लेखी प्रस्ताव गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांना दिला आहे.
गेल्या काही वर्षांत जोगेश्वरीतील लोकसंख्येत तसेच कारखान्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे जोगेश्वरी रेल्वे स्थानकातून दर दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही ३ ते ३.५० लाख प्रवाशांवर जाऊन पोहोचली आहे.
मालाड तसेच गोरेगाव येथून सकाळी गर्दीच्या वेळी सुटणार्या ६ लोकल जोगेश्वरीला न थांबविण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला होता. प्रवाशांनी या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केल्यानंतर या लोकल पुन्हा जोगेश्वरी स्थानकात थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणीही पश्चिम रेल्वेने सुरू केली आहे.
हेही वाचा-
महिला प्रवाशांनो संकटात 'टॉकबॅक' तुमच्या मदतीला
सीएसएमटी-पनवेल, वांद्रे-विरार एलिव्हेटेड रेल्वेला मुहूर्त कधी? वर्ष उलटूनही प्रकल्प कागदावरच