वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध ई चलानद्वारे वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करूनही दंड भरला जात नाही. परिणामी दंडाच्या थकबाकीचा आकडा वाढत असून दहा हजार आणि त्यापेक्षा अधिक प्रलंबित असलेला दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिस थकबाकीदार वाहन मालकांच्या घरी नोटीस देण्यासाठी जात आहेत.
गेले २ आठवड्यापूर्वी वाडतुक पोलिसांनी ही मोहीम सुरू केली. या २ आठवड्यात पोलिसांनी १ कोटी रुपये जमा केले आहेत. वाहतूक विभागाची १२० कोटी रुपये थकबाकी आहेत. दंड न भरणाऱ्या २५ हजार व्यक्तींच्या घरी पोलिस आता धाड मारत आहेत.
२०१९च्या फेब्रुवारी महिन्यापासून ई चलानच्या माध्यमातून दंड आकारण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या हातातील पावती पुस्तक जाऊन हातामध्ये मशीन आल्यानं नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवरील दंडात्मक कारवाईच्या संख्येतही वाढ झाली.
परंतु दुसरीकडे दंडाची थकबाकी प्रचंड वाढू लागली. वाहनमालक दंड भरत नसल्यानं अनेक गाड्यांवरील थकीत दंडाची रक्कमही मोठी आहे. प्रलंबित दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेनं डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ दरम्यान विशेष मोहीम राबवली होती. या दोन महिन्यामध्ये ६ कोटी २५ लाखांचा दंड वसूल करण्यामध्ये पोलिसांना यश आले होते.
दरम्यान, करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्यासाठीच लोकलमधून प्रवास करण्याची मुभा असल्यानं रस्त्यावरील वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
त्याचबरोबर वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन होण्याचंही प्रमाण वाढलं आहे. १० हजार किंवा त्यापेक्षा अधिक प्रलंबित असलेला दंड वसूल करण्यासाठी पुन्हा एकदा वाहतूक शाखेनं विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहीमेअंतर्गत १ कोटी रुपये वसुल केले गेले आहेत.
हेही वाचा