पंजाब आणि महाराष्ट्र को-आॅप बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादल्याने बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. ही बातमी मंगळवारी वाऱ्यासारखी पसरल्यानेे बँक ग्राहक धास्तावून गेले आहेत. मुंबईतील बँकेच्या सर्व शाखांमध्ये ग्राहकांनी तोबा गर्दी केली असून आपले पैसे कसे परत मिळतील, अशा विवंचनेत बँक ग्राहक विचारपूस करताना दिसत आहे.
आरबीआयच्या निर्बंधानुसार पीएमसी बँकेच्या खातेधारकांना आपल्या कुठल्याही खात्यातून केवळ १ हजार रुपये इतकीच रक्कम काढता येणार आहे. शिवाय ‘पीएमसी’ बँकेला नवी कर्ज देणं, ठेवी स्वीकारण्यावरही निर्बंध असतील. पुढील ६ महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध कायम राहतील.
आरबीआयच्या आदेशानुसार २३ सप्टेंबरपासून पीएमसी बँकेला रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतंही नवं कर्ज देता येणार नाही, जुन्या कर्जांचं नूतनीकरण करता येणार नाही, बँकेला कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही, नव्या ठेवी स्वीकारता येणार नाही तसंच बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करता येणार नाही.