गेल्या काही महिन्यांपासून घराघरात चर्चा होणारा एकमेव राष्ट्रीय विषय म्हणजे जीएसटी. बहुधा राष्ट्रीय स्तरावर घेतलेला एखादा निर्णय प्रत्येक घरात पोहोचण्याची आणि चर्चा होण्याची नोटबंदीनंतर ही पहिलीच वेळ असावी! जीएसटीमुळे व्यापाऱ्यांपासून सामान्य जनतेचंही आर्थिक गणित बिघडायला सुरुवात झाली होती.
याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी दिलासा देणारा एक निर्णय जाहीर केला. हॉटेलमधल्या जेवणावर लागणारा 18 टक्के जीएसटी 5 टक्के करण्यात आला. यासोबतच इतरही काही वस्तूंवरचा जीएसटी कमी करण्यात आला. हा निर्णय उद्यापासून अर्थात 15 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.
हॉटेलमधल्या जेवणावरचा जीएसटी कमी केल्यामुळे बाहेर जेवणाऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. तसेच हॉटेल व्यावसायिकांनाही यामुळे काही प्रमाणात फायदा होणार आहे.
यावर बोलताना 'हॉटेलमधील बिलांवरचा जीएसटी कमी करण्याचा निर्णय नक्कीच दिलासा देणारा आहे', अशी प्रतिक्रिया हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन वेस्टर्न इंडिया (एचआरएडब्ल्यूआय)चे अध्यक्ष दिलीप दतवाणी यांनी दिली.
गेल्या काही महिन्यांमध्ये कच्च्या मालाच्या किंमती वाढल्यामुळेच हॉटेलमध्ये जेवणाच्या किंमती वाढवाव्या लागल्या होत्या. मात्र आता त्या कमी करण्यात आल्या आहेत. कच्च्या मालाच्या किंमती अजून कमी झाल्यास, खाद्यपदार्थांच्या किंमती अजून कमी होऊ शकतात.
आदर्श शेट्टी, अध्यक्ष, इंडियन हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन(एएचएआर)
जीएसटी वाढवल्यामुळे हॉटेल व्यवसायावर परिणाम जाणवू लागला होता. काही हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय तर 30 टक्क्यांनी घसरला होता, तर घरपोच होणाऱ्या व्यवसायात 80 टक्क्यांची घट झाली होती. मात्र, या नव्या निर्णयामुळे हॉटेल व्यावसायिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असेल हे नक्की!
हेही वाचा