सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी अर्ज करण्याकरीता २ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. असं असलं, तरी आतापर्यंत महापालिका आणि पोलिसांच्या छाननीमध्ये गणेशोत्सव मंडळांचे एकूण २२३ अर्ज नाकारण्यात आल्याने ही मंडळं नाराज आहेत. या २२३ मंडळांना पुन्हा आवश्यक कागदपत्रे सादर करता न आल्यास त्यांना यंदाचा गणेशोत्सव साजरा करता येणार नाही. एवढंच नाही, तर या मंडळांनी मंडप उभारल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिका पहिल्यांदाच आॅनलाइन परवानगी देत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑनलाइन परवानगीला चांगला प्रतिसाद मिळत असून यावर्षी २६९४ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली आहे.
यापैकी एकाच मंडळांचे अनेक अर्ज तसंच इतर कारणांमुळे आतापर्यंत ५९४ अर्ज रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरीत २१०० अर्जांपैकी एकूण १४२५ मंडळांच्या अर्जांना परवानगी देण्यात आली आहे. तर महापालिका व पोलिसांच्या छाननीमध्ये २२३ अर्ज नाकारण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली. उर्वरीत ४५२ अर्जांवर पुढील २ दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ज्या २२३ मंडळांचे अर्ज छाननीमध्ये पोलिस व महापालिकेने नाकारले आहेत, त्यापैकी किती मंडळे नवीन अथवा जुनी आहेत, किंबहुंना यापूर्वी त्यांनी त्या जागांवर गणेशोत्सव केला आहे, याची कोणतीही माहिती महापालिका गणेशोत्सवाचे समन्वयक नरेंद्र बर्डे यांच्याकडे नाही.
गणेशोत्सव मंडळांच्या २२३ अर्जांपैकी ७६ अर्ज पोलिसांनी, तर ११५ अर्ज विभागाच्या देखभाल विभागाचा सहायक अभियंता आणि उर्वरीत अर्ज हे विभागाच्या सहायक आयुक्तांनी नाकारले आहेत. उपनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीचे पदाधिकारी शिवसेना नेते लिलाधर डाके तसंच उपनेते विनोद घोसाळकर यांनी याबाबत महापौरांच्या उपस्थितीतच बर्डे यांच्याकडे याबाबत विचारणा केल्यानंतरही त्यांच्याकडे याचं उत्तर नव्हतं. त्यामुळे नाकारण्यात आलेल्या अर्जदार मंडळांने मागील वर्षी गणेशोत्सव साजरा केला होता, तर त्याला त्या आधारे परवानगी देण्यात यावी, अशी सूचना त्यांनी मांडली.
गणपती मंडळांना ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत अर्ज करण्याची वाढीव मुदत देण्यात आली होती. परंतु आता या मुदतीत २ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती महापौरांनी दिली. ज्यांचे अर्ज त्रुटींमुळे फेटाळलेले आहेत, त्यांनीही त्या त्रुटींची पूर्तता करून मुदतीत फेरअर्ज केल्यास त्यांना परवानगी मिळू शकेल. त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी महापालिकेची परवानगी घेऊनच मंडप उभारावेत, असे आवाहन उपायुक्त तथा गणेशोत्सवाचे समन्वयक नरेंद्र बर्डे यांनी केलं आहे.
हेही वाचा-
ही ७ कारणं वाचून इको फ्रेंडली बाप्पाला द्याल पसंती