कांदिवली पूर्वेकडील परिसरात पाणीसाठा करून रहिवाशांना जादा दराने पाणी विकणाऱ्या पाणी माफियांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले. कांदिवली पूर्वेकडील क्रांतीनगर भागातील पाणी टंचाईबाबत आणि पाणी माफियांबाबत
आमदार प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी मांडली होती, त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले.
क्रांतीनगर भागातील झोपडपट्टीला मालाड जलाशयातून पाणीपुरवठा करण्यात येतो. या पाणीपुरवठ्यासाठी १५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीतून १५० मिमी व्यासाची वितरण जलवाहिनी टाकण्यात आली आहे. ही झोपडपट्टी जलवाहिनीपासून २५ मीटर उंचीवर असल्याने जलवाहिनीतून कमी-जास्त दाबाने पाणी पुरवठा होतो. याचा फायदा घेत काही पाणी माफिया पाण्याचा साठा करत रहिवाशांना जादा दराने पाणी विकत त्यांची लूट करत असल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे.
रहिवाशांची समस्या दूर करण्यासाठी निम्नस्तरावर शोषण टाकी व उदंचन व्यवस्था करून शोषण टाकीत जलजोडणी देण्यात आली आहे. शिवाय जलाशयाच्या दुरूस्तीचं काम जून २०१८ मध्ये पूर्ण झालं आहे. यानंतर या जलवहिनीद्वारे नियमित पाणीपुरठा सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
पाणी चोरून टाक्यांमध्ये साठवून विकण्याचा प्रयत्न करण्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मनपा व पोलिसांना दिले आहेत. शिवाय ११५ अनधिकृत जलजोडण्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने खंडित केल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा-
मुख्यमंत्री म्हणतात, ''मुंबईत फक्त ४ हजार खड्डे''
भिडेंच्या आंबा, मनूप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका!