भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील (राणी बाग) मगरींच्या तलावात प्रचंड प्रमाणात शेवाळाचा थर निर्माण झाल्याने मगरी दिसेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे मगर पाहण्याच्या उत्सुकतेपोटी आलेल्या पर्यटकांना मगरीचा अक्षरश: शोध घ्यावा लागत आहे. मगर पाहण्याच्या प्रतीक्षेत पर्यटकांना अर्धा तास मगर वर येण्याची वाट पाहावी लागत आहे.
[ हे पण वाचा - राणी बागेचा होणार कायापालट ]
गेल्या काही दिवसांपासून राणीच्या बागेतील मगरी असलेल्या तलावात प्रचंड प्रमाणात शेवाळाचा थर निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. तलावात मगरी दिसाव्यात यासाठी पाणी स्वच्छ असणे आवश्यक आहे. त्या बघण्यासाठी त्यासाठी दूरवरून पर्यटक येथे येतात. परंतु शेवाळाच्या थरामध्ये गुडूप झालेल्या मगरीने डोके वर काढले तरच त्यांचे दर्शन पर्यटकांना घेता येत आहे. तिकीट काढून बच्चेकंपनीला मगरी दाखविण्याकरिता येणाऱ्यांचा यामुळे हिरमोड होत आहे.
[ हे पण वाचा - राणीच्या बागेतील स्वच्छता गृहाला टाळे ]
काही पर्यटक यावर जालीम उपाय योजत दगडांचा मारा करून मगरींना डोके वर काढायला भाग पाडत आहेत. अर्धा पाऊण तास थांबूनही मगरीने डोके वर न काढल्याने निराश होऊन मगर न बघताच पर्यटकांना परतावे लागत आहे. त्यामुळे तलावातील पाणी स्वच्छ करावे जेणेकरून मगर पाहता येईल अशी प्रतिक्रिया पर्यटकांनी व्यक्त केली आहे.