Advertisement

एमपीएससी घोटळ्याच्या चौकशीला गती द्या, संघर्ष समिती आक्रमक

एमपीएससी आणि सरकारी नोकरभरती घोटाळ्याविरोधात 'नोकरभरती भ्रष्टाचार विरोधी संघर्ष समिती' आक्रमक झाली आहे. या घोटाळ्याची चौकशी करत दोषींना त्वरीत शिक्षा द्यावी ही संघर्ष समितीची मागणी आहे.

एमपीएससी घोटळ्याच्या चौकशीला गती द्या, संघर्ष समिती आक्रमक
SHARES

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि सरकारी नोकरभरती घोटाळ्याविरोधात 'नोकरभरती भ्रष्टाचार विरोधी संघर्ष समिती' आक्रमक झाली आहे. या घोटाळ्याची चौकशी करत दोषींना त्वरीत शिक्षा द्यावी ही संघर्ष समितीची मागणी आहे. या मागणीकडं कानाडोळा करणाऱ्या राज्य सरकारला दणका देण्यासाठी संघर्ष समितीनं लाँग मार्चची हाक दिली. 

त्यानुसार १९ मे रोजी पुण्यातून निघालेला विद्यार्थ्यांचा लाँग मार्च शुक्रवारी मुंबईतील आझाद मैदानावर येऊन धडकला. यावेळी विद्यार्थ्यांनी घोटाळ्याच्या चौकशीची आणि दोषींना शिक्षा देण्याची मागणी उचलून धरत संघर्ष समितीनं राज्यपालांच्या सचिवांची भेट घेतली. या भेटीत सचिवांनी येत्या ८ दिवसांत विद्यार्थ्यांची राज्यपालांशी भेट करून देण्याचं आश्वासन दिलं.


काय आहे नोकरभरती घोटाळा?

एमपीएससी परीक्षेत डमी विद्यार्थी बसवून सरकारी नोकरभरतीत घोटाळा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश नांदेडमधील मांडवी येथील योगेश जाधव या विद्यार्थ्यानं केला. त्यानंतर आजपर्यंत या घोटाळ्याप्रकरणी १०० हून अधिक आरोपी आणि अधिकाऱ्यांना एसआयटी तसचं पोलिसांनी अटक केली आहे.



चौकशीला गती हवी

यातील अनेकांना न्यायालयाकडून जामीन मिळाला असून एसआयटी आणि पोलिसांकडून कारवाई सुरूच आहे. मात्र या घोटाळ्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकारकडून कुठलीही कडक पावलं उचलली जात नसल्याचं संघर्ष समितीचं म्हणणं आहे. शिवाय या प्रकरणाची चौकशीही म्हणावी त्या वेगानं होत नसल्याचा संघर्ष समितीचा आरोप आहे.


मुलुंड चेकनाक्यावर अडवलं

त्यामुळे संघर्ष समितीनं पुणे ते मुंबई लाँग मार्चची हाक दिली. त्यानुसार १९ मे रोजी पुण्यातील डेक्कन नदीपात्र चौपाटी इथून लाँग मार्चला सुरूवात झाली आणि गुरूवारी रात्री लाँग मार्च मुलुंडला पोहचला. यावेळी आंदोलनास परवानगी नसल्याचं म्हणत पोलिसांनी मुलुंड इथंच हा लाँग मार्च अडवला. तर काही आंदोलक विद्यार्थांना ताब्यातही घेतलं. शुक्रवारी सकाळी विद्यार्थ्यांना सोडून देण्यात आलं.



राज्यपालांच्या भेटीचं आश्वासन

त्यानंतर शुक्रवारी सकाळी लाँग मार्च आझाद मैदानावर धडकला आणि इथं विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शन केली. शेवटी राज्यपालांच्या सचिवांनी ८ दिवसांत राज्यपालांची भेट घडवून देण्याचं आश्वासन दिल्यानं लाँग मार्चचा समारोप करण्यात आल्याची माहिती योगेश जाधवने दिली आहे. तर ८ दिवसानंतर राज्यपालांची भेट झाली नाही वा बैठक झाली नाही, तर राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती योगेश जाधवने दिली.



हेही वाचा-

एमपीएससीच्या उमेदवारांनो, ३१ मेपर्यंत प्रोफाईल आधारशी जोडा, नाहीतर...



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा