रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांनी व्यवसाय करू नये, यासाठी दादर रेल्वे स्थानक परिसरात महापालिकेच्या जी/उत्तर विभागाने १५० मीटरची सीमारेषा आखली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने ही सीमा आखली असून सध्या तरी या हद्दीत कुठल्याही फेरीवाल्याने बसण्याचं धारिष्ट्य न दाखवल्याने प्रवासी समाधानी आहेत.
फेरीवाल्यांना कुठेही धंदा करता यावा या मागणीसाठी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष निरुपम यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने सुनावणी करत परवानगी नसलेल्या क्षेत्रात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मनाई केली. शाळा, धार्मिक स्थळ, रुग्णालयापासून १०० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास सक्त मनाई असून रेल्वे स्थानक, मनपा मंडईपासून १५० मीटर परिसरातही फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे. या आदेशाचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.
त्यानुसार सर्वाधिक गर्दीच्या दादर रेल्वे स्थानकापासून सेनापती बापट रोड, डॉ. डिसिल्वा रोड, जावळे रोड, रानडे रोड या ४ प्रमुख गर्दीच्या मार्गांवर ही सीमा रेषा प्रामुख्याने आखलेली पाहायला मिळत आहे.
१५० मीटर परिसराची हद्द निश्चित केल्याने महापालिका कर्मचाऱ्यांनाही आता अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणे सोपे जाणार आहे. न्यायालयाचे आदेश न पाळणाऱ्या फेरीवाल्यांवर थेट कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
हेही वाचा-
फेरीवाला धोरणात ८० टक्के परवाने मराठी तरूणांनाच हवे - संदीप देशपांडे
फेरीवालामुक्त मुंबईसाठी 'मनसे शपथ'