घाटकोपरमधील साई सिद्धी इमारत दुर्घटनेतील प्रमुख आरोपी असलेल्या सुनील शितप याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्या, तरी या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनाही कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या या अधिकाऱ्यांची नावे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधीमंडळात जाहीरच करून टाकली असून सहा कर्मचारी यामध्ये अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
साई सिद्धी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचे बळी गेले असून या सर्वांच्या मृत्यूला शिवसेनेचा पदाधिकारी असलेला सुनील शितप मुख्य आरोपी ठरला आहे. परंतु, शितप हा या प्रकरणात एकटा नसून मुंबई महापालिकेचे काही अधिकारी आणि कर्मचारीही या घटनेसाठी तितकेच जबाबदार आहेत. सुनिल शितप पाठोपाठ चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागेही लागला आहे. विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांवर थेट आरोप करत संपूर्ण चौकशीची मागणी केलीय.
महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनीही या प्रकरणी उपायुक्त चंद्रशेखर चौरे आणि संचालक विनोद चिठोरे यांची चौकशी समिती नेमली आहे. या चौकशी समितीपुढे एन विभागाच्या विधी विभागाचा लिपिक, इमारत व देखभाल विभागाचे सहायक अभियंता, पदनिर्देशित अधिकारी, तत्कालीन प्रभारी सहायक आयुक्त, इमारत व देखभाल विभागाचे दुय्यम अभियंता, कनिष्ठ अभियंता आदींची चौकशी केली जाणार असून या सर्वांविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवला जाणार असल्याचे बोलले जात आहे. महापालिकेने नेमलेल्या द्विसदस्यीय समितीच्या अहवालानंतरही ही कारवाई नक्कीच होईल, असे मत माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)