वांद्र्यातील शासकीय वसाहतीत राहणाऱ्या एकाच कुटुंबातील ४ जणांनी विष पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी दुपारी उघडकीस आला आहे. या कुटुंबाने गरिबीला कंटाळून आत्महत्या केल्याचं म्हटलं जात असून खेरवाडी पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. राजेश भिंगारे (45), अश्विनी भिंगारे, तुषार भिंगारे (23), गौरांग भिंगारे (19) अशी चौघांची नावे आहेत
वांद्र्यातील शासकीय वसाहत क्रमांक 2 मध्ये राहणारे राजेश भिंगारे यांनी आपली पत्नी आणि 2 मुलांसह दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास झुरळ मारण्याचं औषध पिऊन आत्महत्या केल्याचं उघड होताच, परिसरात एकच खळबळ उडाली. राजेश भिंगारे मंत्रालयातील शिधावाटप कार्यालयात नोकरी करत होते.
राजेश यांच्या घरात आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे. यामध्ये त्यांनी गरिबीला कंटाळून आत्महत्या केल्याचं लिहिलं आहे. वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात पाठवले असून तपास सुरू केला आहे.
कफ परेडच्या मच्छीमार नगर परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली होती. कमकुवत आर्थिक परिस्थितीला कंटाळून नैराश्येतून पटेल कुटुंबीयांनी हे पाऊल उचललं असल्याचं म्हटलं जात आहे. त्यापाठोपाठ वांद्र्यातील घटनेमुळे ताणतणावामुळे मुंबईकरांची मानसिक स्थिती खालावत चालल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा-
कफ परेडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या
तरुणाची लोकलसमोर उडी टाकून आत्महत्या