मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याची कबुली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिल्यानंतर दिर्घकाळ रेंगाळलेल्या या खटल्याच्या सुनावणीला पुन्हा सुरूवात झाली आहे.
मुंबईसह देशाला हादरवून टाकणाऱ्या २६/११ हल्ल्याचा खटला पाकिस्तानात सुरू होता. मुंबईवरील हल्ल्याची जलद गतीनं सुनावणी व्हावी यासाठी पाकिस्ताननं एटीसी न्यायालयाची स्थापना केली होती. त्यानुसार या खटल्याअंतर्गत आतापर्यंत ६८ पाकिस्तानी साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.
हा खटला अंतिम टप्प्यात असून केवळ २ पाकिस्तानी अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवणं बाकी आहे. असं असूनही या खटल्याच्या सुनावणीस दिरंगाई होत असल्याचा आरोप शरीफ यांनी केला होता. एवढंच नव्हे, तर या दिरंगाईला पाकिस्तानी सरकार आणि पाक सैन्याला शरीफ यांनी जबाबदार धरलं होतं.
गेल्या आठवड्यात शरीफ यांनी मुंबईवरील हल्ल्याच्या खटल्यासंदर्भात कबुली देताच बुधवारी पाकिस्तानी न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू झाली. या सुनावणीनुसार पाकिस्तानी न्यायालयानं २७ भारतीय साक्षीदारांच्या उपस्थितीबाबतची माहिती पुढच्या सुनावणीपर्यंत देण्यात यावी, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
तर, फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एफआयए), गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाला सातत्याने नोटीसा पाठवूनही जानेवारी २०१६ पासून आतापर्यंत कोर्टाला भारतीय साक्षीदारांबाबत काहीच माहिती देण्यात आली नसल्याबाबत ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे आता पुढच्या सुनावणीत नेमकं काय होत हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल.
हेही वाचा-
गुजरातमध्ये दुसऱ्या संशयित दहशतवाद्याला अटक
आयएस, इंडियन मुजाहिद्दिन, अंडरवर्ल्ड भारताविरोधात एकवटले