अंधेरीच्या अंबोली परिसरात २०११ साली झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य साक्षीदार अविनाश सोलंकी उर्फ बालीचा (३८) याची अनोळखी व्यक्तींनी हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अंधेरी पूर्वेतील महाकाली केव्ह्ज रोडवरील अपोलो इंडस्ट्रिअल इस्टेटमधील गाळा क्रमांक ३४ मध्ये त्याचा मृतदेह सापडला आहे.
अविनाशच्या डोक्यावर, पोटावर आणि गुप्तांगावर धारदार शस्त्राने आणि जड वस्तूने केलेल्या जखमा आढळून आल्या आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस दोन संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. अविनाशच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला आहे.
आंबोली येथे २०११ मध्ये किनान सॅन्टोस आणि रियुबन फर्नांडिस यांची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडात अविनाश हा मुख्य साक्षीदार होता. या प्रकरणात शेवटपर्यंत त्याची साक्ष बदलली नव्हती. त्याने दिलेल्या साक्षीमुळेच जितेंद्र राणा, सतीश सुलाह, सुनील बोध आणि दीपक तिवल या आरोपींना २०१६ मध्ये आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तसंच २००९ साली चकमक फेम विजय साळसकर यांचा खबरी इरफान मकबूल हसन खान उर्फ इरफान चिंदी याची हत्या झाली होती. या प्रकरणातही अविनाशने साक्षीदार म्हणून महत्वाची भूमिका पार पाडली होती. पोलिसांचा खबरी म्हणून अविनाशचे गुन्हे शाखेतील अनेक पोलिसांशी चांगले संबंध होते.
दहा वर्षांपूर्वी अविनाशच्या निलेश या मित्राला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली होती. निलेश सध्या जामीनावर बाहेर आहे. त्याच्या कौटुंबिक कलहातही अविनाश मध्यस्थ म्हणून भूमिका पार पाडायचा. मात्र, नेमकं अविनाश आणि त्याच्या मित्रामध्ये असं काय घडलं कि ज्यामुळे अविनाशचा खून झाला याचा पोलीस तपास करत आहेत. मात्र, अविनाशचा खून मित्रानेच केला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तसंच हा आरोपी एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
हेही वाचा -
दाभोलकर हत्या प्रकरण: पांगरकरला २८ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी
हॉटेल व्यावसायिकाची मुलुंडमध्ये गोळी झाडून आत्महत्या