Advertisement

टास्क फोर्सच्या ‘या’ मुद्द्यामुळेच दहीहंडीवर यंदाही बंदी!

टास्क फोर्सकडून महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधल्यानेच बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

टास्क फोर्सच्या ‘या’ मुद्द्यामुळेच दहीहंडीवर यंदाही बंदी!
SHARES

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी सार्वजनिक दहीहंडी उत्सवावर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय, तर सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त होतेय. परंतु टास्क फोर्सकडून महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधल्यानेच बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील दहीहंडी समन्वय समितीचे पदाधिकारी आणि गोविंदा पथकांशी ऑनलाईन बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, नीती आयोगाने परवाच आपल्या अहवालात तिसऱ्या लाटेची शक्यता आणि लागणाऱ्या आयसीयु बेडची संख्या याचा अंदाज व्यक्त करून आपली काळजी वाढवली आहे. आपली यंत्रणा आजही आपला जीव धोक्यात घालून कोरानाशी लढत आहे. आपण समजूतीने वागलो नाहीत तर या धोक्यातून आपण कधीच बाहेर पडू शकणार नाही. आपली ऑक्सिजन निर्मिती ही रोज १२०० ते १३०० मे.टन इतकीच मर्यादित आहेत. इतर रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची गरज वगळता कोरोना रुग्णांसाठीच्या ऑक्सिजनची मागणी  ७५० मे.टनच्या वर गेल्यास आपल्याला नाईलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा. 

तर, महाराष्ट्रात अजून दुसरी लाट ओसरलेली नाही, त्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे, डेल्टा प्लस विषाणू घातक आणि वेगाने पसरणारा आहे हे सगळे सांगितलं जात असताना धोका स्वीकारण्यात अर्थ नाही. सर्वधर्मियांनी आपले सगळे सण उत्सव आतापर्यंत जसे साधेपणाने, घरात राहून साजरे केले आणि शासनाला सहकार्य केलं तसंच सहकार्य यापुढेही द्यावे असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. 

अर्थचक्र सुरु राहण्यासाठी काही निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली असून शासनाचं पहिलं प्राधान्य लोकांची सुरक्षितता आणि नागरिकांचे प्राण वाचवण्याला असल्याचं मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यावेळी सांगितलं. 

हेही वाचा- यंदाही मानाच्या हंड्या फुटणार नाहीत; राज्य सरकारनं नाकारली परवानगी

३५ च्या आतील तरूण

या उत्सवात  मोठ्या प्रमाणात तरूणवर्ग सहभागी होतो जो ३५ च्या आतल्या वयोगटातील असतो. अजूनही आपल्याकडे या वयोगटातील युवकांचे पूर्णपणे लसीकरण झालेलं नाही, असं मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी यावेळी सांगितलं. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्युट फॉर डिझॅस्टर मॅनेजमेंट ने तसेच नीती आयोगाने दिलेल्या तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्याची माहिती दिली. बहृन्मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी कोरोनाकाळात  गणेशोत्सवासह सर्व सण साधेपणाने साजरे करण्याची गरज व्यक्त केली.

जवळून संपर्क

टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी दहीहंडीचा उत्सव हा अतिशय जवळून, एकमेकांच्या सहकार्याने साजरा करण्यात येणारा सण आहे, या खेळात मानवी थर रचले जात असतांना एकमेकांना  जवळून स्पर्श होतो, थर लावतांना अंगावर पाणी टाकले जाते, पावसाळा सुरु आहे, पाण्याने मास्क भिजला तर मास्कची सुरक्षितता संपूर्ण संपुष्टात येते हे सांगतांना त्यांनी डेल्टा प्लस हा विषाणू घातक असून तो वेगाने पसरत असल्याची माहिती उपस्थितांना दिली. 

दहीहंडी पथकातील एखाद्या गोविंदाला जरी लागण झालेली असेल तर पूर्ण चमू ताबडतोब बाधित होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. कोरोनाने आजही आपण आपले आप्तस्वकीय गमावत असल्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आणि हा सण आपण रक्तदान, औषधे आणि कोरोना प्रतिबंधात्मक साधनांचा पुरवठा करून साजरा करू, आपल्या उत्सवाचं “स्पीरीट” वेगळ्या पद्धतीने जपू, असं आवाहन केलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा