संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई), राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (नीट) या दोन्ही परीक्षा वर्षातून दोनदा व ऑनलाईनद्वारे होतील असा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारनं ४५ दिवसांपूर्वी घेतला होता. मात्र, या निर्णयात बदल करत नीटची परीक्षा वर्षातून एकदा व ऑफलाईनच घेतली जाईल, असं एका प्रसिद्धपत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे. या निर्णयामुळं अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार असल्यानं या निर्णयावर अनेक विद्यार्थी नाराजी व्यक्त करत आहेत.
संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई), राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा (नीट) या दोन्ही परीक्षा वर्षातून दोनदा व ऑनलाईन होतील असा महत्त्वपूर्ण निर्णय ७ जुलै २०१८ ला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केला होता. तसंच नीटची परीक्षा फेब्रुवारी व मे महिन्यात तर जेईई मेनची परीक्षा जानेवारी व एप्रिल महिन्यात घेतल्या जातील, असंही त्यांनी जाहीर केलं होतं. या परीक्षा आता कॉम्प्युटरवर घेतल्या जातील, असंही स्पष्ट केलं होतं.
४५ दिवसानंतर अाता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतलेल्या या निर्णयात मोठा बदल केला आहे. येत्या शैक्षणिक वर्षात होणारी नीटची परीक्षा वर्षातून एकदाच घेतली जाणार असून ती ऑफलाईन म्हणजे लेखी स्वरूपात घेण्यात येणार आहे. जेईई परीक्षा मात्र वर्षातून दोनदा घेतली जाणार असून ती ऑनलाईन स्वरूपातच होणार आहे.
येत्या १ ते ३० सप्टेंबरपर्यंत जेईई मेन १ या परीक्षेसाठी नोंदणी करता येणार असून ६ ते २० जानेवारी २०१९ दरम्यान ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेचा निकाल ३१ जानेवारी २०१९ ला जाहीर होणार आहे. त्यानंतर ८ फेब्रुवारी ते ७ मार्च २०१९ मध्ये दुसऱ्या जेईई मेनसाठी नोंदणी करता येणार आहे. दुसरी जेईई परीक्षा ६ ते २० एप्रिल २०१९ दरम्यान घेतील जाणार असून ३० एप्रिलला या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.
येत्या १ नोव्हेंबरपासून नीटच्या परीक्षेची नोंदणीला सुरूवात होणार असून ३० नोव्हेंबरपर्यंत ही नोंदणी करण्यात येणार आहे. ही परीक्षा ५ मे २०१९ ला घेण्यात येणार असून ५ जूनला या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
हेही वाचा -
अकरावी प्रवेश प्रकिया गुणवत्तेनुसारच
कलिना कॅम्पसमध्ये विद्यार्थिनींसाठी कडेकोट सुरक्षा, बसवणार ३०० सीसीटीव्ही