Advertisement

मुंबई विद्यापीठाचे रखडलेले १८ निकाल लवकरच!

मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळास कारणीभूत ठरलेल्या ऑनलाइन मूल्यांकन प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यास परीक्षा विभागाला यश आल्याचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले. तसेच, सध्या निकाल प्रक्रियेला वेग आला असून येत्या काळात या प्रक्रियेत काही बदल करण्यात येणार आहेत.

मुंबई विद्यापीठाचे रखडलेले १८ निकाल लवकरच!
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन मूल्यांकन प्रक्रियेत करण्यात आलेेले बदल, रखडलेले निकाल, तसेच विद्यापीठाची एकंदर कामकाजाची प्रक्रिया जाहीर करण्यासाठी बुधवारी मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी पत्रकार परिषद बोलवली होती. या पत्रकार परिषदेत उत्तरपत्रिका, नव्याने डॅशबोर्ड निर्मिती यांसारख्या अन्य गोष्टींची माहिती देण्यात आली.


ऑनलाइन मूल्यांकनातील त्रुटी दूर

मुंबई विद्यापीठाच्या निकाल गोंधळास कारणीभूत ठरलेल्या ऑनलाइन मूल्यांकन प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यास परीक्षा विभागाला यश आल्याचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले. तसेच, सध्या निकाल प्रक्रियेला वेग आला असून येत्या काळात या प्रक्रियेत काही बदल करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे ही प्रक्रिया इतर विद्यापीठांसाठी आदर्श ठरली असून विविध ठिकाणच्या पाच विद्यापीठांनी ही प्रक्रिया जाणून घेण्यासाठी हजेरी लावली असल्याचेही त्यांनी सांगितले.


पुनर्मूल्यांकन अर्ज ऑनलाइन

ऑनलाइन असेसमेंट प्रक्रियेतही परीक्षा व मूल्यमापन विभागाने अनेक बदल केले असून यापुढे विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन आणि त्याच्या फोटो कॉपीसाठी कॉलेजकडे अर्ज करण्याची गरज भासणार नाही. ही सर्व प्रक्रिया आता पूर्णत: ऑनलाईन करण्यात येणार असून यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज स्विकारले जाणार आहेत. तसेच, येत्या काळात सर्व निकाल विद्यापीठाच्या कायद्यानुसार दिलेल्या वेळेतच जाहीर करण्यात येतील, असेही प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले.


रखडलेले १८ निकाल लवकरच

गेल्या वर्षी हिवाळी सत्रात घेण्यात आलेल्या ४०२ निकालांपैकी केवळ १८ निकाल जाहीर झालेले नाहीत. हे उर्वरित निकाल येत्या आठवड्याभरात जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती अर्जुन घाटुळे यांनी दिली आहे. त्याशिवाय आतापर्यंत ३८४ निकाल जाहीर करण्यात आले असून एकूण ४५ हजार ८०७ विद्यार्थ्यांचे निकाल बाकी आहेत.


नव्या डॅशबोर्डची निर्मिती

विद्यापीठाद्वारे येत्या काही दिवसांत नव्या डॅशबोर्डची निर्मिती करण्यात येणार असून यामुळे विद्यापीठ व कॉलेजच्या प्राचार्यांना फायदा होणार आहे. तसेच यामुळे विद्यापीठाच्या निकालाच्या कामाचा एकंदर आढावा घेणे शक्य होणार आहे. यावर्षीपासून निकाल गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक कॉलेजला विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा दीडपट अधिक पेपरची तपासणी करावी लागणार असून याची संपूर्ण माहिती सर्व कॉलेजच्या प्राचार्यांना देण्यात आली आहे.



हेही वाचा

'लाॅ'च्या निकालातील चूक लपवण्यासाठी फेरपरीक्षेचा घाट!

'आयडॉल'च्या पहिल्याच पेपरला 'लेटमार्क'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा