Advertisement

निसर्ग चक्रीवादळ मुंबईपासून अवघ्या १९० कि.मी. अंतरावर

मुंबईच्या दिशेनं वादळाचा वेग वाढला असून, हे वादळ मुंबईपासून अवघ्या १९० कि.मी. अंतरावर आहे.

निसर्ग चक्रीवादळ मुंबईपासून अवघ्या १९० कि.मी. अंतरावर
SHARES

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक भागात जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईच्या दिशेनं वादळाचा वेग वाढला असून, हे वादळ मुंबईपासून अवघ्या १९० कि.मी. अंतरावर आहे. हे चक्रीवादळ बुधवारी दुपारी अलिबागजवळ धडकण्याची शक्यता आहे. ताशी १३ किलोमीटर वेगानं हे वादळ पुढे सरकत आहे. जमिनीवर धडकताना ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगानं वारे वाहतील, असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. 

निसर्ग वादळ मुंबईच्या दिशेनं वेगानं सरकत असून, पहाटे ५ वाजताच्या मुंबईपासून हे वादळ २५० तर अलिबागपासून २०० किलोमीटर अंतरावर होते. त्यानंतर ६.३० वाजताच्या स्थितीनुसार वादळ मुंबईपासून २०० व अलिबागपासून १५५ किमी अंतरावर आलं. त्यानंतर ७.३० वाजता हे अंतर अनुक्रमे १९० आणि १४० किमी इतकं कमी झाल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा -निसर्ग चक्रीवादळ: दादर, माहीम किनाऱ्यालगत राहणाऱ्या जनतेला पालिकेचं आवाहन

निसर्ग चक्रीवादळ रायगडसह मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ५ जिल्ह्यांत मोठं नुकसान करण्याची शक्यता आहे. गुजरातमधील वलसाड, नवसारी, डांग, सुरत तसेच दमण, दादरा नगर हवेली भागालाही निसर्गचा फटका बसण्याची शक्यता आहे. या संपूर्ण भागांसाठी रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. या वादळासोबतच मुसळधार पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

हेही वाचा - मुंबईच्या दिशेनं चक्रिवादळ, काय कराल आणि काय नाही?

मुंबईत पूरस्थिती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी पालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल राज्य सरकारच्या यंत्रणांशी समन्वय साधून पावले टाकत आहेत. निसर्गच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील गावांतील कच्च्या घरांत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. महाराष्ट्राला चक्रीवादळाचा फारसा अनुभव नसल्यानं चक्रीवादळ आलं तर काय करायचं, काय तयारी हवी, त्याची तीव्रता किती असेल या सगळ्याबद्दल नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालं आहे. 

चक्रीवादळ जमिनीवर धडकल्यानंतर साधारण ४ तासांपर्यंत त्याचा परिणाम जाणवेल, असा अंदाज आहे. या काळामध्ये झोपड्या, कच्ची घरे यांना सर्वाधिक धोका आहे. या घरांचे छप्पर उडून जाऊ शकते, घरांवर टाकलेले पत्रेही उडून जाऊ शकतात. वीजपुरवठा, संवादाच्या सेवा खंडीत होऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.



हेही वाचा -

निसर्ग चक्रीवादळासाठी नौदल सज्ज, पाच बचाव पथकासह, तीन डाव्हींग पथक तयार

'निसर्ग' चक्रीवादळ अलिबाग समुद्र किनाऱ्याला धडकणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा