२६ जुलै... मुंबईकर कधीही विसरू शकणार नाहीत असाच तो दिवस होता. सोसाट्याचा वारा आणि धो-धो पाऊस, नद्या आणि नाले ओसंडून वाहत होते. रस्त्यांवर पाणीच पाणी होते. त्यात गाड्यांच्या लांबच लांब रांगा, गुडघाभर पाण्यातून एकमेकांना साथ देणारे मुंबईकर... भयानक चित्र होते. पुरात अनेक घरं उद्धवस्त झाली होती. कित्येकांनी आपले प्राण गमावले होते. कुणाचा मुलगा, कुणाची बायको, तर कुणाचे वडील या प्रलयात वाहून गेले होते. तर करोडो रूपयांची वित्तहानी झाली होती. मुंबईकरांच्या मनावर २६ जुलै २००५ हा दिवस कायमचा कोरला गेला. आज सुद्धा या दिवसाची आठवण झाली की मुंबईकरांच्या अंगावर काटा येतो.
पावसाचे साचलेले पाणी गटरातून आणि नाल्यांमधून समुद्रात मिळते. पण हे साचलेले पाणी प्लॅस्टिकमुळे अडकून राहिले. नाल्यांच्या तोंडाशी या पिशव्या अडकल्या. त्यामुळेच पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. पण २६ जुलैच्या घटनेनंतर पालिकेला जाग आली. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या वापरावर पालिकेने बंदी घातली. तसेच दुकानदार आणि सामान्य मुंबईकरांनी कापडाच्या आणि कागदाच्या पिशव्या वापराव्यात, असा सल्ला देखील सरकारने दिला होता.
सरकारने जरी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातली असली, तरी आजही सर्रास या पिशव्यांचा वापर केला जातो. अगदी बोटावर मोजण्याइतके मुंबईकर असतील जे कागदी आणि कापडी पिशव्यांचा वापर करत असतील. प्लॅस्टिकचे परिणाम माहीत असूनही आजही कित्येक जण प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करतात. त्यामुळे कुठे ना कुठे आपण सुद्धा २६ जुलैच्या प्रलयासाठी जबाबदार आहोत. प्लॅस्टिकच्या पिशव्या बाजारात कशा उपलब्ध होतात? याकडे पालिकेने सुद्धा लक्ष दिले पाहिजे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या बनवणाऱ्या कारखाऩ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या पुन्हा वापरता येत नाहीत. मुंबईतल्या गटारांमध्ये आणि नाल्यांमध्ये प्लॅस्टिकचा ढीग पडलेला असतो. गटार आणि नाल्यांमधून हे प्लॅस्टिक समुद्रात जाते. पाण्याच्या प्रवाहासोबत प्लॅस्टिकचा कचरा किनाऱ्यावर येतो. किनाऱ्यावर हे प्लॅस्टिक तसेच पडून राहते. त्यामुळे परिसरात मच्छरांचा प्रादुर्भाव वाढतो.
याप्रकरणी आम्ही पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी याप्रकरणी बोलण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आता प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर सरकारने लवकरात लवकर कठोर पाऊल उचलावे. नाहीतर २६ जुलैची पुनरावृत्ती अटळ आहे.
हेही वाचा
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)