पर्यावरणाचे संवर्धन आणि वृक्षांचे जतन व्हावे, यासाठी यंदा गणेशोत्सवात अनेकांनी इको फ्रेंडली पद्धतीने बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली आहे.
जोगेश्वरी पूर्व येथील राजेश्वर सोसायटीमध्ये राहणारे भाई मिर्लेकर आणि त्यांच्या कुटुंबियांनीही इको फ्रेंडली पद्धतीनेच बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे.
हे कुटुंबीय चार वर्षांपासून आपल्या घरात बाप्पाच्या पितळेच्या मूर्तीची स्थापना करत आहेत. यंदाचे हे पाचवे वर्ष असून गेल्या वर्षी त्यांनी वृक्षलागवड आणि वृक्ष संवर्धन करण्याविषयी संदेश देण्यासाठी विविध फळ आणि फूल झाडांची रोपटीच लाऊन बाप्पासाठी सजावट केली होती. ही संकल्पना त्यांची पत्नी सायली मिर्लेकर यांची होती.
यावर्षी त्यांनी आपल्या घरातल्या बाप्पासाठी विविध पुस्तकांची सजावट केली आहे. यामध्ये भगवद् गीता, लोकमान्य टिळकांच्या चरित्रापासून ते बाबासाहेब पुरंदरे यांच्या 'राजा शिवछत्रपती' या ग्रंथापर्यंत अनेक विषयांवरील पुस्तकांची सजावट केली आहे.
या गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन देखील त्यांनी घरीच पिंपामधे फुले आणि दूध मिश्रीत पाण्यामध्ये केले. यामुळे तलावतील पाणी दूषित होत नाही. रंगांमधील रसायने पाण्यात मिसळून माशांच्या जिवाला होणारा धोकाही टाळता येईल. अशा प्रकारे इको फ्रेंडली पद्धतीने गणपतीच्या मूर्तीची स्थापना करणे, ही काळाची गरज आहे, असे मिर्लेकर कुटुंबियांचे म्हणणे आहे.
हेही वाचा -
सई ताम्हणकरचा पर्यावरण पूरक 'ट्री गणेशा'!