महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात उद्यापासून गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे गणेशमूर्ती खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये अनेक ठिकाणी गणेश मंडळांकडून गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. आता मुंबईतील गणेशभक्तांसाठी बेस्ट प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळात मुंबईतील विविध ठिकाणी बेस्टच्या बसेस रात्रभर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईत रात्रभर 20 बसेस धावणार असून त्याद्वारे बाप्पाचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांना विविध ठिकाणी फिरता येणार आहे.
गणेशोत्सवाच्या शेवटच्या पाच दिवसांत ही सुविधा दिली जाणार असल्याचे बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. गणेशोत्सव काळात रात्रभर मुंबईत विविध ठिकाणी भाविक गणरायाचे दर्शन घेतात.
आरती आणि पूजेच्या वेळीही भाविकांची गर्दी होते. त्यामुळे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्टने रात्रीच्या वेळी 20 जादा बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील अनेक भाविक तीन ते पाच दिवस घरी गणपतीची पूजा करतात. विसर्जनानंतर गणपती मंडळाच्या गणेशमूर्ती पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
हेही वाचा
अनंत चतुर्दशी आणि ईद एकाच दिवशी, नवी मुंबईतील मुस्लिम बांधवांचा मोठा निर्णय