Advertisement

विमा नसल्यास दहीहंडी पथकांना रचता येणार नाहीत थर!

दहीहंडी पथकातील तरूणांनी मंडळाने आपल्या नावाचा विमा काढला आहे की नाही, हे देखील आवर्जून बघितलं पाहिजे. कारण विमा नसणाऱ्या दहीहंडी उत्सव मंडळाला यंदा पोलिसांकडून थर लावण्यास परवानगीच देण्यात येणार नाहीय.

विमा नसल्यास दहीहंडी पथकांना रचता येणार नाहीत थर!
SHARES

दहीहंडी उत्सव ३ दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबई, ठाण्यातील तरूणाई सध्या उत्साहात आहे. प्रतिस्पर्धी मंडळाच्या तुलनेत जास्त थर लावण्यासाठी कसून सराव केला जातोय. पारितोषिकाची रक्कम पटकावण्यासाठी डावपेच आखले जाताहेत. तर विरोधी मंडळाच्या कच्च्या दुव्यांवरही नजर ठेवली जात आहे. असं असताना दहीहंडी पथकातील तरूणांनी मंडळाने आपल्या नावाचा विमा काढला आहे की नाही, हे देखील आवर्जून बघितलं पाहिजे. कारण विमा नसणाऱ्या दहीहंडी उत्सव मंडळाला यंदा पोलिसांकडून थर लावण्यास परवानगीच देण्यात येणार नाहीय.


न्यायालयाचे निर्देश

दरवर्षी मुंबईसह राज्यभरात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र दहीहंडी फोडण्यासाठी थर लावताना थर कोसळून अपघातही होतात. यामध्ये काही तरूण गंभीर जखमी होतात, तर काहींना आपला जीव गमवाव लागतो. या घटनांचं गांभीर्य लक्षात घेऊन गोविंदा पथकाने न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक गोविंदाचा १० लाख रुपयांचा विमा काढाणं बंधनकारक आहे.


निम्म्या मंडळांनीच काढला विमा

सध्या ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीमार्फत गोविंदा पथकांचा विमा काढला जात आहे. मुंबईसह राज्यभरात दीड हजारपेक्षा अधिक गोविंदा पथकं आहेत. तर मुंबईत ९५० पेक्षा अधिक गोविंदा पथक आहेत. यापैकी केवळ ४०० हून अधिक गोविंदा पथकांनीच गोविंदाचा विमा काढला आहे, अशी माहिती दहिहंडी समन्वय समितीचे सचिव सुरेंद्र पांचाळ यांनी दिली.


पोलिसांची कडक भूमिका

मुंबई उच्च न्यायालयाने गोविंदा पथकांच्या विम्याची दखल घेत गोविंदा पथकांकडं विमा नसल्यास त्यांना दहीहंडी खेळण्यास परवानगी देऊ नये तसंच कुठल्याही प्रकारचं 'ना हरकत' प्रमाणपत्र देऊ नये, अशी सूचना न्यायालयाने पोलिसांना केल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांनीही कडक भूमिका घेतली असून विमा नसल्यास गोविंदा पथकांना परवानगी देण्यात येणार नाही.


कार्यालय सुरू ठेवण्याची विनंती

गोविंदाचा विमा काढण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट आहे. मात्र, अजूनही गोविंदा पथकांनी विमा काढला नसल्यामुळं दहिहंडी समन्वय समितीच्यामार्फत ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीला शनिवारी आणि रविवारी कार्यालय सुरू ठेवण्याचं पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यामुळं लहान असो वा मोठ्या सर्वच गोविंदा पथकांनी लवकरात लवकर विमा काढावा.
- सुरेंद्र पांचाळ, सचिव, दहीहंडी समन्वय समिती



हेही वाचा-

गोविंदांचा विमा १० लाखांचा!

संकल्पची दहीहंडी यंदाही नाही!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा