रुग्णांना तात्काळ उपचार मिळावं या उद्देशाने मुंबईत प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या बाईक ॲम्ब्युलन्सने ८ महिन्यात अडीच हजारापेक्षा जास्त रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. प्राथमिक उपचारानंतर अत्यावश्यक सेवेच्या रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी यातील काही रुग्णांना रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत बाईक ॲम्ब्युलन्स तात्काळ प्रतिसाद देणारी ठरली आहे.
मुंबईत ऑगस्ट २൦१७ मध्ये १൦ बाईक ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून ही सेवा सुरू करण्यात आली. अल्पावधीतच या सेवेसाठीच्या १൦८ क्रमांकावर दिवसाला शेकडो कॉल येत आहेत.
विशेषत: रेल्वे स्टेशनचा परिसर, चिंचोळ्या गल्ली अशा ठिकाणाहून कॉल येण्याचे प्रमाण जास्त आहे. मुंबईत भांडूप, मानखुर्द, धारावी, नागपाडा, मालाड, चारकोप, गोरेगांव, ठाकुर व्हिलेज, कलिना आणि खारदांडा या ठिकाणी बाईक ॲम्ब्युलन्स तैनात करण्यात आल्या आहेत.
ऑगस्ट २൦१७ ते मार्च २൦१८ या कालावधीत २५൦൦ हून अधिक रुग्णांना बाईक ॲम्ब्युलन्सने तत्काळ प्रतिसाद आणि प्राथमिक उपचार देऊन त्यांना जीवदान दिले आहे. त्यामध्ये अपघातातील जखमी अशा रुग्णांची संख्या २६७ असून विविध वैद्यकीय आपत्कालीन मदतीसाठी १ हजार ३७९ रुग्णांना प्रतिसाद देण्यात आला आहे.
बाईक ॲम्ब्युलन्सवरील चालक डॉक्टर असल्याने कॉल येताच तात्काळ प्रतिसाद दिला जातो. रुग्णांची प्राथमिक तपासणी आणि प्रथमोपचार करुन आवश्यकता भासल्यास त्याला पुढील उपचाराकरता रुग्णालयात पाठवले जाते. त्यामुळे मुंबईत या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे. दिवसाला जवळपास १൦൦ पेक्षा अधिक रुग्णांवर प्राथमिक उपचार केले जातात.
गेल्या वर्षी सॅण्डहर्स्ट् रोडवर इमारत कोसळल्याच्या घटनेत नागपाडा पोलिस स्टेशनजवळ असलेल्या बाईक ॲम्ब्युलन्सने घटना स्थळाकडे धाव घेतली आणि या ठिकाणी जखमी झालेल्या ५ रुग्णांना तातडीने उपचार दिले. अशा प्रकारच्या अनेक दुर्घटनांमध्ये बाईक ॲम्बुलन्सने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
मुंबईत बाईक ॲम्ब्युलन्सला लाभलेला प्रतिसाद पाहता राज्यात नव्याने ३൦ बाईक ॲम्ब्युलन्स सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी सांगितलं.
पालघर, जव्हार, मोखाडा, नंदुरबार, मेळघाट या डोंगराळ भागात २൦ बाईक ॲम्बुलन्स सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अजून १൦ बाईक ॲम्ब्युलन्स मुंबईमध्ये सुरू करण्यात येणार आहे. दुर्गम भागात चारचाकी वाहन पोहोचू शकत नाही, अशा परिस्थितीत बाईक ॲम्ब्युलन्स या भागासाठी वरदान ठरेल असं, आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
हेही वाचा -