राज्यात शनिवारी १२१ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं असून आतापर्यंत राज्यभरात २००० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. शनिवारी कोरोनाबाधित ७९० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण रुग्णसंख्या १२ हजार २९६ झाली आहे. तर एकूण ९७७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दीड लाखांहून अधिक क्वारंटाईनमध्ये
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ६१ हजार ९२ नमुन्यांपैकी १ लाख ४८ हजार २४८ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत, तर १२ हजार २९६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १ लाख ७४ हजार ९३३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १२ हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
हेही वाचा - डॉक्टरच आहेत धारावीतील COVID-19 चाचणीचे खरे शिलेदार!
मुंबईत २ हजार अतिरिक्त खाटा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये २ हजार अतिरिक्त खाटांची उपलब्धता करण्यात येत असून दाट लोकवस्तीच्या ठिकाणी राहणाऱ्या आणि ज्यांना मधुमेह, रक्तदाब अशा अन्य आजारांची लक्षणे (कोमॉर्बीड) असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे सर्वांत आधी सर्वेक्षण करून त्यांना आवश्यकत भासल्यास संस्थात्मक क्वारंटाईन करावे आणि त्यांच्यावर वेळेवर उपचार होईल, अशी नवी कार्यपद्धती ठरविण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
५२१ जणांचा मृत्यू
शनिवारी राज्यात ३६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात आतापर्यंत ५२१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ८४४ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १० हजार ५१३ सर्वेक्षण पथकांनी काम केलं असून त्यांनी ४४.४० लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेलं आहे